मोठी बातमी! फक्त 200 रुपयांचेच पेट्रोल मिळणार, सरकारचा थेट आदेश आला…पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा!
आता जिल्हा प्रशासनाने फक्त 200 रुपयांचे पेट्रोल मिळेल, असा आदेश काढला आहे. या आदेशामुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसत आहे. चारचाकी वाहनांसाठीही असाच एक नियम तयार करण्यात आला आहे.

Petrol Pump : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतात उर्जासंकट निर्माण झालं आहे. घरगुती गॅस महागला आहे. गॅस बुकिंग करूनही तो वेळेवर मिळत नाहीये. मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारच्या घटना वाढत आहेत. महाराष्ट्रातही गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत काळ्या बाजाराची काही प्रकरणं समोर आली आहे. दुसरीकडे अनेक अफवांचेही पेव फुटले आहे. गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. सोबतच पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठाही खंडीत होणार आहे, अशी अफवा अनेक ठिकाणी पसवरली जात आहे. त्यामुळे कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात काही ठिकाणी पेट्रोलच्या विक्रीत 30 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. असे असतानाच आता प्रशासनाचा एक मोठा निर्णय समोर आला आहे. आता प्रत्येक दुचाकीसाठी फक्त 200 रुपयांचेच पेट्रोल मिळेल, असा सरकारी आदेश काढण्यात आला आहे.
फक्त 200 रुपयांचे पेट्रोल मिळणार
हा आदेश कोल्हापूर प्रशासनाने काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाकडून दुचाकीसाठी 200 रुपये तर तीन चाकी आणि चार चाकी वाहनांसाठी दोन हजार रुपये पेट्रोल विक्रीची मर्यादा घालून देण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात वाढपेट्रोल आणि डिझेल विक्रीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे समतोल साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल पंप चालकांना देण्यात आली आहे.
कोल्हापुरात नेमका काय घोळ झाला?
सध्याच्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल बंद होणार असल्याची अफवा पसरली. त्यामुळे कोल्हापुरातील पेट्रोल पंपांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्द झाली. अचानकपणे कोल्हापुरात पेट्रोल, डिझेलची विक्री प्रचंड वाढली. हे प्रमाण रोजच्या विक्रीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळेच कोल्हापुरात पेट्रोल संपल्याने शहरासह उपनगरातील पेट्रोल पंप ठेवण्यात आले होते. इंधन वितरणाचा मोठा असमतोल निर्माण झाला. त्यामुळेच आता हा गोंधळ पुन्हा उडू नये यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे. दरम्यान, हा निर्णय फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे. तो महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांसाठी लागू नसेल.
