तर घरात भांडण होणार! मोदींनी तेल कमी वापरा म्हणताच महिलांची वेगळीच अडचण
अमरावतीमधील महिलांनी पंतप्रधानांच्या 'तेल कमी वापरा' या आवाहनावर आपली नाराजी आणि अडचण व्यक्त केली आहे. आता या महिलांनी नेमकी काय अडचण सांगितली जाणून घ्या...

आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली जागतिक परिस्थिती पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल, डिझेलसह खाद्यतेल आणि सोने खरेदी मर्यादित करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर सर्वसामान्यांमध्ये, विशेषतः महिला वर्गामध्ये आणि व्यापारी वर्गात मोठी चर्चा सुरू झाली असून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
“तेलाशिवाय भाजीला चवच येत नाही”
अमरावतीमधील महिलांनी पंतप्रधानांच्या ‘तेल कमी वापरा’ या आवाहनावर आपली नाराजी आणि अडचण व्यक्त केली आहे. महिलांचे म्हणणे आहे की, भारतीय स्वयंपाकात तेलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. “भाजीत तेल कमी टाकले तर भाजीला चव येत नाही आणि चव नसेल तर कुटुंबात वादाचे प्रसंग निर्माण होतात,” अशी भीती महिलांनी व्यक्त केली आहे.
काही महिलांनी तर उद्विग्न होऊन प्रश्न विचारला की, “जर भाजीत तेलच कमी वापरायचे असेल, तर मग रोज काय बेसन-भाकरच खायची का?” तेलाशिवाय भाजी चांगली होत नसल्याने गृहिणींचे बजेट आणि स्वयंपाकघरातील चव दोन्ही बिघडणार असल्याचे चित्र अमरावतीत पाहायला मिळत आहे.
सोन्याबाबत मोदींचे विधान
केवळ खाद्यतेलच नाही, तर पंतप्रधानांनी सोने खरेदीबाबतही विधान केले आहे. यावर कोल्हापूरच्या प्रसिद्ध सराफ बाजारातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कोल्हापूरच्या सराफ व्यापाऱ्यांच्या मते, मोदींचे हे वक्तव्य मोठ्या गुंतवणूकदारांसाठी किंवा खरेदीदारांसाठी असू शकते. “भारतीय संस्कृतीत लग्नसोहळे सोन्या-चांदीच्या दागिन्याशिवाय पूर्ण होत नाहीत. त्यामुळे सामान्य ग्राहक, जो गरजेपुरते सोने खरेदी करतो, त्यावर याचा फारसा परिणाम होणार नाही,” असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. मात्र, सोन्याचे दर आधीच गगनाला भिडले असल्याने सामान्य माणूस हतबल आहे.
पर्यटन क्षेत्राला ४० ते ५० टक्क्यांचा फटका?
विदेशात जाण्याऐवजी पर्यटकांनी काश्मीर, हिमाचल, लेह-लडाख किंवा दार्जिलिंग यांसारख्या देशी पर्यटन स्थळांना पसंती द्यावी, असेही त्यांनी सुचवले आहे. मात्र, ज्यांनी आधीच परदेश दौऱ्यांचे बुकिंग केले आहे, त्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. एकूणच, युद्धाच्या सावलीमुळे देशावर पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनामुळे आता सर्वसामान्यांच्या ताटातील चवीपासून ते लग्नातील सोन्यापर्यंत आणि पर्यटनापर्यंत सर्वच गोष्टींवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
