पुण्यात भूमीगत मेट्रोत साचलं पाणी, 100 फुट खोल टनेलमध्ये घडलं असं काही की…धक्कादायक माहिती समोर!
पुण्यात एक अजब घटना घडली आहे. भूमीगत मेट्रोच्या छतातून चक्क पाणीगळती होत आहे. यामुळे मेट्रोचे तब्बल 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर आता भूमीगत मेट्रोच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

Pune Metro : पुण्यातील स्वारगेट-पिंपरी येथे अजब प्रकार घडला आहे. येथील भूमिगत मेट्रो मार्गात पाणी जमा व्हायला लागले आहे. यामागचे कारणही तसेच अजब आहे. याच भागातील एका घरमालकाने घराच्या परिसरात बोअरवेल घेतल्याने मेट्रोच्या बोगद्यात पाणी पाझरत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आता या मालकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे या घटनेमुळे मेट्रो प्रशासनाचे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
नेमकं काय घडलं?
या घटनेमुळे पुणे भूमिगत मेट्रोची सुरक्षा धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. बोअरवेलमुळे मेट्रो मार्गिकेत पाणी गळतीला सुरुवात झाली आहे. धनंजय मोटे असे घराच्या परिसरात बोअरवेल घेणाऱ्या घरमालकाचे नाव आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी घरमालक तसेच ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घराखालून भूमिगत मेट्रो मार्गिका गेली असल्याची माहिती असताना शुक्रवार पेठेतील धनंजय मोटे नामक घरमालकाने बोरवेल घेतल्याने हा प्रकार घडला. बोअरवेलमुळे स्वारगेट पिंपरी भूमिगत मेट्रो मार्गिकेत पाणी गळती सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसरात ही घटना घडली.
25 लाख रुपयांचे नुकसान
हा प्रकार समोर येताच मेट्रोतील अधिकाऱ्यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मिळालेल्या माहितीनुसार मेट्रो मार्गिकेचा हा बोगदा जमिनीपासून साधारण 80 ते 100 फूट खोल आहे. बोगद्यात सहा इंच भेग पडल्याने ही पाणीगळती होत आहे. त्यामुळे मेट्रोच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेमध्ये मेट्रो प्रशासनाचे मात्र 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे आरोपी घरमालकाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आम्ही बोअरवेल घेताना मार्यादीत स्वरुपातच जमिनीत ड्रिलिंग केली. आम्हाला फक्त 24 फुटानंतर पाणी लागले. त्यामुळे आम्ही आणखी खोल ड्रिलिंग केली नाही. त्यामुळे बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या छताला कशी हानी झाली, याबाबत आम्हाला कल्पना नाही, असे या घरमालकाने सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी भविष्यात काय होणार? मेट्रोच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार का? प्रशासन याबाबत काय खबरदारी घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
