Manoj Jarange: ते तर नपुंसक…टिपू सुलतानच्या वादात मनोज जरांगेंची उडी, हर्षवर्धन सपकाळांसह काँग्रेस अजून अडचणीत?
Manaoj Jarange Criticized Harshawardhan Sapkal: आज खरंतर शिवजयंती आहे. पण राज्यात टिपू सुलतानचा वाद संपलेला नाही. या वादात आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा उडी घेतली आहे. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.

Manaoj Jarange Criticized Harshawardhan Sapkal: आज राज्यभर शिवजयंती साजरी होत आहे. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतानबाबतच्या वक्तव्याने मोठा गदारोळ निर्माण झाला. या वादाचे पडसाद आजही राज्यात उमटत आहेत. या वादात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा उडी घेतली आहे. त्यांनी सपकाळांवर जहरी टीका केली. टिपू सुलतानचा वाद हा मालेगावपासून सुरू झाला. मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपूची तसबीर लावण्यात आली. पुढे या वादात सपकाळ यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि तेच वादात अडकले. आता त्यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली आहे.
वाद तरी काय?
मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्यात दालनात टिपू सुलतानची तसबीर लावण्यात आली. इतर कोणत्याही महापुरूषांचा फोटो दालनात नव्हता. त्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी एकच गोंधळ घातला. त्यामुळे दालनातील टिपूची तसबीर लागलीच हटवण्यात आली. या वादावर पडदा पडणार असे वाटत असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याने वाद पेटला. पार डोकी फुटण्यापर्यंत भाजप आणि काँग्रेसचं वाजलं.
हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य काय?
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाधक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानचे कार्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे असे विधान केले. महाराजांची तुलना टिपूशी केल्याचा दावा करत भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी सपकाळ आणि काँग्रेसविरोधात रान पेटवले. राज्यभरात सत्ताधारी पक्षानेच विरोधकांविरोधात मोर्चा काढले. काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर धडक मोर्चा निघाला. पुण्यात तर दगडफेकही झाली. अखेर या वादावर सपकाळ यांनी दिलगिरी व्यक्त केली. शिवजयंती तोंडावर असतानाच हा वाद उफाळून आला.
टिपूची महाराजांशी तुलना करणारे नपुंसक
या वादात मनोज जरांगे पाटील यांनीही उडी घेतली आहे. टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारे नपुंसक असल्याची जहरी टीका मनोज जरांगे यांनी केली. सारंकाही राजकारणासाठी चाललंय, असा निशाणा जरांगेंनी सपकाळांवर साधला. छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी जगात कुणीही करू शकत नाही. राजकारणासाठी, कुणाला खुश करण्यासाठी काही बोलणार, मी तर त्याच दिवशी या वक्तव्याचा निषेध केला असे जरांगे पाटील म्हणाले.
