पुण्यात मृत्यूचे तांडव, विषारी दारू कांडातील मृतांचा आकडा वाढला, बळींची संख्या किती?
पुणे-पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा २४ वर पोहोचला असून २१ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. भिवंडीतून ५,९२९ लिटर मिथेनॉल जप्त झाले असून सीआयडी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा आता २४ वर पोहोचला आहे. हडपसरमधील काळेपडळ परिसरात बुधवारी आणि गुरुवारी आणखी २ जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. विकास किसन केदारी (६०), निलेश घोलप (४५) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही ससाणे नगर परिसरात राहात होते. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांना या दोघांबद्दल आधी कोणतीही माहिती नव्हती. या नवीन मृत्यूमुळे एकट्या पुणे शहरात विषारी दारु प्यायल्याने झालेल्या मृतांची संख्या ९ पर्यंत पोहोचली झाली आहे. फुगेवाडी आणि उरुळी कांचन येथेही शनिवारी मृत्यूची नोंद झाली असून, संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजला आहे.
या गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, तपासाला वेग आला आहे. या संवेदनशील प्रकरणाचा सखोल तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला असून, सीआयडीने यासाठी ५ विशेष पथके तयार केली आहेत. सुरुवातीला राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
याप्रकरणी कर्तव्यात कमालीचा निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणाचा अभाव असल्याचा ठपका ठेवत २१ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील एकूण २१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
भिवंडी कनेक्शन उघड, ५,९२९ लिटर मिथेनॉल जप्त
पुण्यातील या विषारी दारूचे धागेदोरे ठाणे जिल्ह्यातील भिवंडीपर्यंत पोहोचले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भिवंडीतील एका गोदामावर शुक्रवारी रात्री मोठा छापा टाकून तब्बल ५,९२९ लिटर मिथेनॉलचा साठा जप्त केला आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यात विषारी दारू तयार करण्यासाठी याच मिथेनॉलचा वापर करण्यात आला होता, असे बोललं जात आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड कारवाई; ४२ हजार लिटर रसायन नष्ट
विषारी दारुच्या घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अवैध अड्ड्यांवर छापे मारून ४,४८० लिटर गावठी दारू जप्त केली आहे. तसेच दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले तब्बल ४२ हजार लिटर घातक रसायन नष्ट केले आहे. या कारवाईत आतापर्यंत ५२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, पुणे ग्रामीणमधील पौड पोलिसांनी मुळशी, रिहे, कातरखडक, घोटावडे, माले, आंबवणे, भादस, मुठा आणि करमोळी परिसरात धडक मोहीम राबवून गेल्या दोन दिवसांत १० ते १२ हातभट्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत.
नागपूर जिल्ह्यातही मोठी मोहीम; ५६ जणांवर गुन्हे दाखल
पुण्यातील भीषण घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. नागपूर जिल्ह्यातही अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील ४३ ठिकाणी धाडी टाकून ५६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंगणा, कामठी, कोराडी आणि एमआयडीसी भागात या कारवाई केल्या जात आहेत.
तसेच नागपूर शहर पोलिसांनी तहसील ठाण्याच्या हद्दीतील टिमकी परिसरातून आणि गिट्टीखदान परिसरातून महिला आरोपींना अटक केली आहे. या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर गावठी व देशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, पुण्यासारखी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच पोलिसांना जाग येते का? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
