
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. आज शिवाजी पार्कवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांकडून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. याआधी अनेकदा भाजपने उद्योगपती गौतम अदांनींना मोठ्या प्रमाणात उद्योग दिले असा आरोप होत होता. आता राज ठाकरेंनी 2014 साली अदानींचे साम्राज्य किती होते आणि 2025 पर्यंत त्यात किती वाढ झाली याची माहिती दिली आहे.
राज ठाकरेंनी म्हटले की, मुंबई विकायला काढली. देश विकायला काढला. २०२४मध्ये एक व्यक्ती भेटली. लोकसभेनंतर. त्याने जी माहिती दिली त्यानंतर माझे सर्व लोकं माझी रिसर्च टीम कामाला लागली. जे काही झालंय ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. मी जे दाखवणार आहे. त्यानंतर भीती नाही वाटली तर या देशात निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. फक्त 2014 मोदी पंतप्रधान झाले तेव्हा मला 2024 च्या नंतर समजायला लागलं. विधानसभा निवडणुकीच्या आसपास रिसर्च टिमकडून गोष्टी आल्या त्याचा धक्का बसला. आपण बघत नाही. आपण डोळे झाक करतो. हिंदी इंग्रजी टेलिव्हिजन चॅनल ब्लॉक केलंय. कुणी काही दाखवत नाही. दाखवलं तर वरून दट्ट्या येतो. जाहिराती बंद करू. मी भारताचा 2014 चा मॅप दाखवतो. दाखवा रे.
राज ठाकरेंनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये 2014 साली अदानींचे साम्राज्य काही मर्यादित ठिकाणी होते, मात्र 2025 पर्यंत अदांनींचे साम्राज्य हे संपूर्ण देशात पसरलेले दिसत आहे, या 10 वर्षांच्या काळात शेकडो प्रकल्प अदानींना मिळाल्याचे दिसत आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 2014 ला गौतम अदानी यांचे प्रकल्प किती होते. मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अदानी कुठे होते. आता 2025 ला गौतम अदानी कुठे आहेत. फक्त सरकारच्या आशीर्वादाने. तुम्हाला नाही धक्का बसला तर सांगा मला.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, हे फक्त 10 वर्षांतील आहे. जगात असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षात इतका श्रीमंत झाला. उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाही. इतका दळभद्री नाही. या देशात इतके उद्योगपती असताना एकाच माणसाला सर्व गोष्टी दिल्या. सिमेंट, वीज दिल्या. सिमेंट उद्योगात अदानी कधी नव्हताच. आज देशातील दोन नंबरचा उद्योगपती आहे. सिमेंट महाग केलं तर काही बोलू शकणार नाही. सर्व पोर्ट अदानीला. सर्व विमानतळे अदानीला. उद्या वीज बंद केली तर आपण काही बोलू शकणार नाही. महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे पाहा.
राज ठाकरे यांनी प्रत्येक वर्षी महाराष्ट्रात अदानीचा उद्योग कसा निर्माण झाला हे दाखवलं आहे. यानंतर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात 2014 ला अदानीचा एका ठिकाणी उद्योग होता. 2025 पर्यंत जवळ जवळ सर्व महाराष्ट्रात उद्योग झाले.ही महाराष्ट्राची स्थिती. एमएमआरमध्येही काय केलं पाहा. तुम्हाला कसं आवळलं जातंय. हे काय चाललंय ना माहीत आहे का.