राज्यसभेची उमेदवारी कोणाला? संजय राऊतांनी थेट नावच सांगितली, म्हणाले काँग्रेसकडून…
राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकासआघाडीत चर्चा सुरू असल्याचे संजय राऊत यांनी मान्य केले आहे. तसेच, त्यांनी शिंदे गट-भाजप वाद आणि इराण-इस्रायल युद्धावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाविकासआघाडीत राज्यसभेच्या एका जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार, यावरुन सध्या चर्चा सुरु आहेत. आता याच चर्चेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत वादावरही भाष्य केले आहे. यासोबतच इराण-इस्रायल युद्धाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट करावी आणि शोक व्यक्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
एका जागेवरुन तीन पक्षात सातत्याने चर्चा सुरु
महाविकासआघाडी हा तीन तिघाडा आहे, पण काम बिघाडा नक्कीच नाही. महायुतीतही तीन चाकी रिक्षा आहे. या गोष्टी अशा निवडणुकांमध्ये होत असतात. एक जागा आहे, एका जागेवरुन तीन पक्षात सातत्याने चर्चा सुरु आहे. शेवटच्या मिनिटांपर्यंत ती सुरुच राहिलं. त्यामुळे आता पाहू, असे संजय राऊत म्हणाले.
काँग्रेसमधून कोण इच्छुक आहे, हे मला माहिती नाही. राष्ट्रवादीतून शरद पवार इच्छुक आहेत, शिवसेना ठाकरे गटातून प्रियांका चतुर्वेदी निवृत्त होतात. आमच्या पक्षातून राजन विचारे, विनायक राऊत इच्छुक आहे. इच्छा व्यक्त करण्याला हरकत नाही. पण निर्णय पक्ष घेत असतो, पक्षप्रमुख घेत असतात. मात्र उद्धव ठाकरे ह्यावर निर्णय घेतील. काल उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली. लवकरच निर्णय होईल, अशीही माहिती संजय राऊत यांनी दिली.
प्रत्येकाला वाटत आपला आपला प्रतिनिधी असावा. तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एकमेकांशी चर्चा आहे. शरद पवार कधीही एनडीएसोबत जाणार नाही. मी त्यांना एवढे वर्षे ओळखतो, ते जाणार नाही, असे ठाम विधान संजय राऊतांनी केले.
शिंदे गट आणि भाजपमधील वादावर टीका
श्रीकांत शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वाढत्या वादावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, हा वाद महाराष्ट्राच्या हिताचा नाही. तसेच, जय पवार यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
युद्धाचे मोठे परिणाम जगाला भोगावे लागणार – संजय राऊत
तसेच सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धावरून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. शाळांवर हल्ले होत आहेत, हे क्रूर कृत्य आहे. भारताच्या मित्राच्या मृत्यूवर शोक व्यक्त करायला भीती कसली वाटते? मोदींनी इराण-इस्रायल युद्ध थांबवले पाहिजे आणि या संकटावर शोक व्यक्त करायला हवा,” असे संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊतांनी युद्धाचे मोठे परिणाम जगाला भोगावे लागतील, अशी भीती व्यक्त केली.
