मनोज जरांगे माझे मित्र, पण तेही कलाकारच… रामदास आठवले यांनी काढला चिमटा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणापूर्वी रामदास आठवलेंनी त्यांना 'मित्र पण कलाकार' म्हटले. मुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या बाजूने असून EWS चा लाभ मराठा समाजाला मिळावा अशी मागणी त्यांनी केली. रिपाइंला महामंडळे व विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आरपारच्या लढाईसाठी सिद्ध झाले आहेत. उद्यापासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होणरा आहे. रणरणत्या उन्हात आंदोलन करण्याचा आणि पाण्याचा थेंबही न घेण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. तसेच आपल्या जीवाला काही धोका झाला तर त्याला सरकारच जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. जरांगे यांनी अत्यंत कठोर इशारा दिल्याने सरकारचंही टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया येत आहेत. रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यावर मी काही बोलणार नाही. पण मुख्यमंत्री मराठा समाजाच्या बाजूने आहेत, असं आठवले यांनी म्हटलं आहे.
रामदास आठवले यांनी आज मिठी नदीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना कलाकार म्हणत चिमटाही काढला. मनोज जरांगे हे माझे चांगले मित्र आहेत, ते पण कलाकारच आहेत. मनोज दादा यांनी काय करावं याबद्दल मी काही बोलणार नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम मराठा समाजाची बाजू घेतलेली आहे आणि त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याचे काम केलेलं आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
मराठा समाजाला फायदा मिळावा
आमची सरकारकडे अशी मागणी आहे की, केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून 10 टक्के ईडब्ल्यूएसचं आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे. त्याचा फायदा मराठा समाजाला होत नाहीये. तो त्यांना मिळावा अशी आमची मागणी आहे, असं आठवले यांनी स्पष्ट केलं.
दोन ते तीन महामंडळं हवेत
महामंडळांच्या नियुक्त्यांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्हाला दोन ते तीन महामंडळाच्या अध्यक्षपद मिळावं, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. आम्हाला एमएलसी मिळणार होती, पण ती सुद्धा आम्हाला मिळू शकली नाही. विधानपरिषदते उमेदवारी मिळू शकत नाही. त्यामुळे आमच्यावर होत असलेला हा अन्याय दूर व्हावा, अशी आम्ही मागणी केलेली आहे. आरपीआयच्या वतीने आम्ही दोन ते तीन महामंडळाचे अध्यक्षपद मागितलेले आहे, असंही त्यांनी सांगितलं.
7 जूनपर्यंत मिठी स्वच्छ होणार
मिठी नदीच्या स्वच्छतेवरही त्यांनी भाष्य केलं. दरवर्षी मिठी नदी भरते. त्यामुळे मिठी नदीची पाहणी करण्यासाठी मी स्वतः ग्राउंड वर पोहोचलो आहे. महानगरपालिकेचे अधिकारी येथे आलेले आहेत. 7 जूनपर्यंत हा सगळा गाळ काढण्याच आश्वासन त्यांनी दिले आहे.लोकांच्या घरात पाणी जातं आणि संसार उद्ध्वस्त होतात, हे होऊ नये याची दखल महानगरपालिकेने घ्यायला हवी, असंही त्यांनी म्हटलंय.
