Sanjay Raut : ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचंच अमित शहा यांनी ऑपरेशन केलंय, 100 वेळा… संजय राऊत यांचा खोचक टोला
खासदार संजय राऊत यांनी 'ऑपरेशन टायगर'च्या दाव्यांना जोरदार फटकारले. शिंदे गटाला टोला लगावत ते म्हणाले की, ज्यांना 'ऑपरेशन टायगर' करायचं होतं, त्यांचं ऑपरेशन अमित शहांनीच १०० वेळा केलं आहे. ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक नियमित असून, मोदी-शहांच्या राजकारणामुळे महाराष्ट्रात विकृती वाढल्याची टीकाही राऊत यांनी केली.

राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू असून द्धव ठाकरे यांचे काही खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी उद्या ( रविवार 14 जून) मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावल्याची चर्चा आहे. मात्र या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तसेच ऑपरेशन टायगर करणार असं जे म्हणतात, त्यांचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं आहे, असा सणसणीत टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. मिंध्यांचा गट सरळ मार्गाने जन्माला आलेला नाही अशी टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली.
खासदारांच्या बैठकीबाबात काय म्हणाले राऊत ?
आमदार, खासदार, नगरसवेकांची बैठक घेणं ही कोणत्याही पक्षातील सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. मातोश्रीवरती अशा बैठका सातत्याने होत असतात. लवकरच अधिवेशन सुरू होईल, त्याआधी पावसाळा सुरू होईल. अनेकांना पावसात मुंबईत पोहोचता येत नाही. त्यामुळे उद्या खासदारांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न, त्यांच्या जिल्ह्यातले प्रश्न जाणून घेणार आहेत. अनेक प्रश्न आहेत, पाऊस नाहीये अनेक ठिकाणी, निधीचा विषय आहे. उद्या 9 खासदारांना बोलावून त्यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
अमित शहांनी त्यांचंच ऑपरेशन केलं
ऑपरेशन टायगरबद्दलही राऊत स्पष्ट बोलले. ‘ हा फुटणार, तो फुटणार तुम्ही जे म्हणताय, या अफवा आणि बातम्या सतत उडवल्या जात असतात. ऑपरेशन टायगर करणार असं जे म्हणतात, त्यांचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलंय’असा खोचक टोला राऊत यांनी लगावला. ‘मिंध्यांचा (शिंदे) गट काय सरळ मार्गाने जन्माला आलेला गट आहे का ? अमित शहांचा पक्ष आहे तो. ती काय शिवसेना आहे का ?’ असंही राऊत म्हणाले.
पक्ष फोडणं, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं ही एकप्रकारची विकृती आहे. जेव्हापासून या महाराष्ट्रात, देशात मोदी-शहांचं राज्य आहे, तेव्हापासून राजकारणातल्या विकृतीने कळस गाठला आहे. महाराष्ट्रासारखं राज्य या दोघांनी पूर्णपणे नासवलं, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली. मात्र याचा अर्थ या गोष्टीला अंत नाही अस नव्हे. या गोष्टीला नक्कीच अंत आहे. योग्य वेळी, महाराष्ट्रात आणि देशातसुद्धा या सगळ्या विकृतीविरुद्ध जनता बंड करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असं राऊत म्हणाले.
