Mahashivratri: लाखो शिवभक्तांना मोठा दिलासा; घृष्णेश्वर मंदिरात गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार
Mahashivratri Verul Grishneshwar Temple: उद्या महाशिवरात्री आहे. त्यापूर्वीच प्रशासनाने भाविक भक्तांना मोठा दिलासा दिला आहे. वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरात देशभरातून भाविक दर्शनाला येतात. त्यांच्यासाठी आनंदवार्ता आली आहे.

Mahashivratri Verul Grishneshwar Temple: महाशिवरात्रीला भाविकांना प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर मध्ये गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात येणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. महाशिवरात्रीला गर्दीचे कारण देत घृष्णेश्वराचे गाभाऱ्यातून दर्शन बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे.त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणे गाभाऱ्यात प्रवेश करून घृष्णेश्वराचे दर्शन आणि स्पर्श करता येणार आहे.
प्रशासनाकडून गाभार्यात जाण्यास बंदी
वेरूळ येथे 12 वे ज्योतिर्लिंग श्री घृषेश्वर मंदिर आहे. इथं महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. मात्र या काळात मोठी गर्दी होते. 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत गर्दी नियंत्रण, सुरक्षा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन लक्षात घेऊन गाभाऱ्याबाहेरून दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे महाशिवरात्रीला श्री घृष्णेश्वराला हात लावून वा डोके टेकून दर्शन बंद ठेवण्याचा यापूर्वी निर्णय जाहीर झाला होता. भाविकांना गेल्या काही दिवसांपासून गाभाऱ्याच्या दरवाजातून दर्शन घ्यावे लागत होते. भाविकांना ओंकारेश्वर मंदिराच्या धर्तीवर घृष्णेश्वराचा जलाभिषेक बाहेरून करण्याचा आणि व्हिआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला होता. गावातील नागरिकांना आधार कार्ड दाखवून पहाटे सहा वाजेपर्यंत दर्शनाचा निर्णय झाला होता.
या निर्णयामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली होती. महाशिवरात्रीला भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागणार असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली होती. वेरुळ येथे 15 फेब्रुवारी रोजी यात्रा भरते. देशभरातून लाखो भाविक इथं येतात. गाभारा दर्शन ठेवल्यास भाविकांना चार ते पाच तास लागणार आहे. पण भाविक त्यासाठी राजी होते. त्यांनी याविषयी प्रशासनाकडे गाभारा दर्शन सुरू करण्याची मागणी केली होती.
प्रशासनाकडून निर्णय मागे
मात्र, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून दर्शन घेण्याची शेकडो वर्षांची परंपरा असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व भाविकांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता.भाविकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पूर्वीचा निर्णय मागे घेत सुधारित आदेश जारी केले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये समाधान व्यक्त होत असून, महाशिवरात्रीसाठी मंदिरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तर महाशिवरात्रीला बाराव्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आता वेळ लागण्याची शक्यता आहे. पण या नवीन आदेशाने भाविकांकडून आनंद व्यक्त केल्या जात आहे. त्यांनी जुना निर्णय मागे घेतल्याने आणि गाभाऱ्यात दर्शनासाठी परवानगी दिल्याने प्रशासनाचे आभार मानले आहे.
