Prasad Lad: एकाच दिवसात उपोषण कसं सुटलं? हॉस्पिटलमध्ये जरांगेंना भेटल्यानंतर प्रसाद लाड यांचे टीकाकारांना सडेतोड उत्तर

Prasad Lad on Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भगवद गीताही त्यांना भेट दिली.

Prasad Lad: एकाच दिवसात उपोषण कसं सुटलं? हॉस्पिटलमध्ये जरांगेंना भेटल्यानंतर प्रसाद लाड यांचे टीकाकारांना सडेतोड उत्तर
प्रसाद लाड, मनोज जरांगे पाटील
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 31, 2026 | 2:14 PM

Prasad Lad on Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांनी 16 मे रोजी उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर सरकारमधून लागलीच प्रतिक्रिया आली नाही. पण दोन तीन दिवसानंतर भाजप आमदार प्रसाद लाड हे भेटायला येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे वक्तव्य जरांगे यांनी केले होते. त्यांच्या या आमंत्रणाला प्रसाद लाड यांनी ही त्याला लागलीच प्रतिसाद दिला. 22 मे रोजी लाड हे अंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यांनी माध्यमांसमोर आणि बंद खोलीत जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मागण्यांचा खलिता घेऊन ते मुंबईत दाखल झाले. मनोज जरांगे पाटील यांना उपोषण करण्याची गरज भासणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले होते. पण जरांगे यांना एक दिवस का होईन उपोषण करावे लागले. या सर्व प्रक्रियेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत लाड होते. काल दुपारच्या सत्रात ते विखेंसोबत नव्हते. पण रात्री ते शिष्टमंडळासोबत अंतरवाली सराटीत दाखल झाले आणि उपोषण सुटेपर्यंत ते थांबले होते. काल जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे लाड यांनी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली.

मराठ्यांनी पहिल्यापासून इतिहास अंगावर घेतलाय

मराठ्यांनी पहिल्यापासून इतिहास अंगावर घेतलाय. समाजाच्या हितासाठी मी शिवधनुष्य अंगावर पेलायला तयार आहे.नकाल परिस्थिती बघितली, शिर्डीला गेलो होतो त्याठिकाणी साई बाबांना सुद्धा प्रार्थना केली होती. आमचे भांडण संपलेले आहे. त्यासाठी मी आज भेट देण्यासाठी भगवद्गीता घेऊन आलो. काल त्यांनी अभ्यासकांकडून काय हवं आहे ते वदून घेतलं, असे आमदार लाड म्हणाले.

एकाच दिवसात कसं सपलं उपोषण?

मला एकाच गोष्टीचा आनंद आहे मनोज दादांना मी आज हॉस्पिटलमध्ये भेटायला आलो. मला काल अनेक लोकांनी फोन केले की एकाच दिवसात उपोषण सुटलं. जे त्यांना पाहिजे होतं ते आम्ही देत असतो, काल ज्यावेळी मी त्यांची परिस्थिती बघितली तर त्यांना दोनदा विनंती केली होती, असे उत्तर लाड यांनी दिले. सगळेच फॉर्मुले माध्यमांना थोडी सांगायचे असतात, त्यांचं जे म्हणणं होतं जे तुम्ही आम्हाला गॅझेटमध्ये लेखी दिलं, त्याच्यातले हे मुद्दे राहिलेत. सरकार दरबारी जाऊन कोण काय सांगतं आणि दादांना येऊन कोण काय सांगते हे कळत नव्हतं, असे लाड म्हणाले.

मला पूर्णपणे खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कुठल्या समाजाच्या लेकरावरती अन्याय होणार नाही. ज्याला त्याचा हक्क देवेंद्र फडणवीस देण्याचं काम करतील. माझी आणि त्यांची भूमिका सातत्याने तीच राहिलेली आहे, आणि तीच भूमिका घेऊन आम्ही भांडत सुद्धा राहिलो. परंतु आमचं भांडण आता मिटलेले आहे त्यामुळे मी त्यांना भगवद्गीताच घेऊन आलेलो आहे, असत्याच्या विरोधात सत्याला लढायचं आहे या भावनेतून मी आलेलो आहे.

विखे पाटील हे ज्येष्ठ आहेत उपसमितीचे अध्यक्ष आहेत, आणि मराठा समाजाचे खूप मोठे नेते आहेत, त्यांनी त्यांच्याशी बोलताना फार स्पष्ट भूमिका घेतली आहे की जे काही 13-14 मुद्दे आहेत. त्याबाबत आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे मगच ते पत्रक दादांना दिले आहे. आणि दादांनी ते मान्य केलं आहे. मी एक आमदार म्हणून मनोज दादांचा भाऊ म्हणून किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मधला एक प्रतिनिधी म्हणून आम्हाला समाजासाठी जेवढं काम करता येईल ते काम आम्ही एक लाख टक्के करायला तयार आहे. कोणत्याही समाजाचे काढून आम्हाला घ्यायचं नाही असे आमदार लाड म्हणाले.

लक्ष्मण हाके यांना राजकारण लखलाभ

मी लक्ष्मण हाके यांना ओळखत नाही, अनेक दिवस ते मला शिव्या देत आहेत. माझ्यामध्ये परिवर्तन झालं म्हणून मी आज भगवद्गीता घेऊन आले आहेत, त्यामुळे लक्ष्मण हाके यांना त्यांचे राजकारण लखलाभ आहे, असा टोला लाड यांनी लगावला. हे काम करत असताना एक राज्याचा मुलगा म्हणून लक्ष्मण हाके यांना सुद्धा माझी गरज लागली, जसं मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आलो तसेच मी लक्ष्मण हाके यांच्याकडे सुद्धा जायला तयार आहे, असे लाड म्हणाले.

Follow Us