AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याने भारतावर बॉम्ब टाकले, त्याचा मुलगा सरसंघचालकांसोबत… संजय राऊत संतापले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात गायक अदनान सामीच्या उपस्थितीवरून संजय राऊत यांनी टीका केली आहे. अदनान सामीच्या वडिलांच्या पार्श्वभूमीचा हवाला देत राऊतांनी संघ आणि भाजपच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ज्याने भारतावर बॉम्ब टाकले, त्याचा मुलगा सरसंघचालकांसोबत... संजय राऊत संतापले
sanjay raut adnan sami
| Updated on: Feb 09, 2026 | 11:05 AM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थितीत असलेल्या व्यक्तींमुळे सध्या राजकीय वादाला तोंड फोडले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या यादीवरून शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी संघ आणि भाजपवर घणाघाती टीका केली आहे. प्रसिद्ध गायक अदनान सामीच्या उपस्थितीवरून राऊतांनी संघाच्या राष्ट्रभक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अशा व्यक्तीचा मुलगा सरसंघचालकांच्या बंगल्यात बसतो

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अदनान सामीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा उल्लेख करत संघाला धारेवर धरले. गायक अदनान सामी हा सरसंघचालकांसोबत बसून ब्रेकफास्ट करत होता. ज्यांनी त्याला निमंत्रण दिले त्यांना कदाचित हे माहिती नसेल की, अदनान सामीचे वडील अर्शद खान हे पाकिस्तानच्या हवाई दलात होते. १९६५ च्या युद्धात त्यांनी भारतावर बॉम्बिंग केले होते. पठाणकोटचा तळ उद्ध्वस्त केला होता. अशा व्यक्तीचा मुलगा सरसंघचालकांच्या बंगल्यात बसतो, हे पाहून धक्का बसला, असे संजय राऊत म्हणाले.

कोणते इतिहासाचे धडे देत आहात?

या मुद्द्यावरून बोलताना संजय राऊतांनी संघ आणि भाजपला ढोंगी आणि पाखंडी असे म्हटले आहे. तुम्ही देशाला कोणती प्रेरणा देत आहात? कोणते इतिहासाचे धडे देत आहात? ज्यांच्या पूर्वजांनी भारतावर हल्ले केले, त्यांच्यासोबत तुम्ही बसताय, यातून तुमचं बिघडलेलं चारित्र्य दिसून येतंय, अशा शब्दांत संजय राऊतांनी आपला संताप व्यक्त केला.

संजय राऊत यांनी केवळ अदनान सामीच नव्हे, तर एकूणच भाजपच्या सत्ताकाळावर टीका केली. भाजप आणि संघ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संघाच्या पाठिंब्यामुळे भाजपला सत्तेचे अच्छे दिन मिळाले, मात्र त्यांच्या सत्तेमुळे देशातील सुबत्ता निघून गेली आहे. भारत देश सध्या अमेरिकेचा गुलाम झाला असून, याची सर्वस्वी जबाबदारी सरसंघचालकांनी स्वीकारली पाहिजे. या कार्यक्रमात अदनान सामीसोबतच काही अशाही व्यक्ती होत्या ज्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. संघ पापावर पांघरुण घालण्याचे काम करत आहे का? असा सवालही राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

विविध क्षेत्रांतील दिग्गज निमंत्रित

काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम मुंबईत पार पडला. या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबतच विविध क्षेत्रांतील दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार, ख्यातनाम शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती. यावेळी संघाने गेल्या १०० वर्षांत केलेल्या कामाचा आढावा घेणे आणि आगामी काळातील ध्येयधोरणांवर चर्चा करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.