विखे-पाटील लवकरच भिकेला लागणार, संजय राऊत यांचा अहिल्यानगरातून घणाघात
संजय राऊत आपल्या घणाघाती भाषणात भाजपावर जोरदार टीका केली, ते म्हणाले की हिंदुत्वात आम्ही तुमचे बाप आहोत. मोदींचा राजयोग संपला आहे. पक्ष फोडायचे, मतं विकत घ्यायची हीच यांची रित आहे...

शिवसेना नेते संजय राऊत यांची तोफ आज अहिल्यानगरात दणाणली. मंत्री विखे-पाटील यांनी काल उबाठा शिल्लक राहणार नाही असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेताना राऊत म्हणाले की अहो, राधाकृष्ण विखे पाटील याच उबाठाने तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना मंत्री केले होते. तुम्ही अनेक घरं बदलून भाजपात आलात.तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवू नका. काँग्रेसने यांना मोठं केलं, हे ऐहसान फरामोश आहेत. भाजपच्या पालख्या वाहाताय, वाईट काळ सर्वांवर येतो.उद्या तुमचा वाईटकाळ येईल, तेंव्हा काहीजण जेलमध्ये जातील, एकनाथ शिंदे हिमालयात निघून जातील. विखे पाटील तुम्ही तुमचे लाचारीचे काम चालू ठेवा, पण शिवसेनेच्या नादी लागू नका,अन्यथा मला इथे येऊन बसावे लागेल असा इशाराही राऊत यांनी शिर्डी येथील शिवसेनेच्या मेळाव्यात दिला.
संजय राऊत पुढे म्हणाले की आपल्याला पुढील अडीच तीन वर्षे फक्त पक्ष आणि संघटन बांधायचे आहे. शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून द्यायचे आहे, ही बाळासाहेबांची शिवसेना, मिंध्येची नाही. आपली शिवसेना हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे. दुसरी अमित शहाची सेना, उठ म्हटले की उठतात.. बस म्हटले की बसतात अशीही टीका यावेळी राऊत यांनी केली.
SIR मुळे भाजपाने पश्चिम बंगालमधली निवडणूक ताब्यात घेतली, जिंकली नाही. इंधनाचे भाव वाढले, सत्ताधाऱ्यांनी दोन दिवस नाटकं केलीत. पेट्रोल 112 रुपये आणि बियर 80 रुपये, गंदा है पर धंदा है अशी स्थिती असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.आपले प्रधानमंत्री पाणी पिण्याबाबत मार्गदर्शन करतात. हे प्रधानमंत्र्याचे काम आहे का? एकीकडे गो हत्या करू नका म्हणतात दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच 15 वर्षांवरील गाय कापण्याची परवानगी देतात आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी केला.
हे सरकार एक परीक्षा नीट घेऊ शकत नाही, राज्य काय चालवणार? या देशात दोनच सेना आहेत. एक सीमेवर भारतीय सेना आणि दुसरी महाराष्ट्रात शिवसेना असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले. ते पुढे म्हणाले की नरेंद्र मोदी दिल्लीत भेटतात, पण डोळ्यात डोळे घालण्याची हिंमत होत नाही. अमित शहा, तुम्ही शिवसेनेच्या पाठीत जो खंजीर खुपसला.एक दिवस तोच खंजीर तुमच्या पाठीत खुपसणार. शिवसैनिक बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आता मागे हटायचे नाही. आम्ही सर्व शिवसैनिकांच्या पाठीशी आहोत असेही राऊत यावेळी म्हणाले. 60 वर्षात छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे सगळे आले आणि गेले. एकनाथ शिंदे तर आहे तिथून कायमचे निघून जातील. मात्र शिवसेना आहे तिथेच राहील असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.
