पक्ष फुटीनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, त्यांना वाटतंय मोठा तीर मारलाय, तोच तीर त्यांच्या…
ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी या बंडखोर खासदारांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. "मोठा तीर मारल्याचं त्यांना वाटतंय, पण तोच तीर त्यांच्या..." असं म्हणत त्यांनी खासदारांच्या 'बेईमानी' आणि 'आईला विकल्याच्या' कृत्याचा निषेध केला. या फुटीनंतर त्यांना नोटीस बजावून अपात्र ठरवण्यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

ठाकरे गटाने बोलावलेल्या संसदीय दलाच्या बैठकीला सहा खासदारांनी दांडी मारल्यानंतर ठाकरे गटाचे हे सहा खासदार फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. हे सहा खासदार फुटल्याने आज त्यांना नोटीस बजावली जाणार आहे. त्यानंतर या खासदारांना बडतर्फ करण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न केले जाणर आहेत. या फुटीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी शेलक्या भाषेत या फुटीर खासदारांवर टीका केली आहे. आपण मोठा तीर मारलाय असं त्यांना वाटत असेल. पण तोच तीर त्यांच्या पार्श्वभागात… असा हल्लाच संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत मीडियाशी संवाद साधताना अत्यंत संतप्त झाले होते. यावेळी त्यांनी फुटीर खासदारांवर घणाघाती टीका केली. लोकांनी मतदान भाजपच्या विरोधात केलं. एकनाथ शिंदेंच्या विरोधात केलं. लोकांनी मशाल चिन्हाला मतदान केलं. हे सर्व लोकं एकनाथ शिंदेंच्या पक्षाविरोधात जिंकून आले आहेत. शिर्डीच्या खासदाराने दोनदा गद्दारी केली. तरीही त्याला तिकीट दिलं. काही लोकांना पक्षात घ्यायला माझा विरोध होता. पुन्हा पुन्हा बेईमानी करतील, असं मी सांगत होतो. पण उद्धव ठाकरे दयाळू आहेत. त्यांनी या लोकांना संधी दिली. आता या लोकांना वाटतंय त्यांनी मोठा तीर मारलाय. पण हा तीर त्यांच्या पार्श्वभागात… अशी टीका संजय राऊत यांनी केली.
ते दोघे दिल्लीत नाही
संजय दिना पाटील आले नाही. ओमराजे पुण्यात आहेत. काल आणि आजही ते आले नाहीत. पण हे दोघेही त्यांच्यासोबत नाही. शिंदे गटाने त्यांना किडनॅप केलंय का? त्यांच्या जीवाला काही धोका आहे का? हे लोकं काहीही करू शकतात. हे लोक दिल्लीत नाही हे समजलं, असं राऊत म्हणाले.
मतदारसंघात जाऊन दाखवाच
उद्धव ठाकरे स्वत: माहिती घेत आहेत. चार पाच खासदार म्हणजे पक्ष नाही. त्यांना खासदार बनवणारे कार्यकर्ता म्हणजे पक्ष आहे. आता लोक रस्त्यावर उतरले आहेत. तुमच्या मतदारसंघात जाऊन दाखवाच. तुम्हाला लष्कर घेऊन जावं लागेल, असा इशाराच त्यांनी दिला.
आता फुटणं सोपं नाही
आम्ही वारंवार बैठका घेत असतो. अशा प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत. त्यांच्यावर वेळ येईल तेव्हा त्यांचं जगणं अवघड होणार आहे. तुम्ही मशाल चिन्हावर निवडून आला. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आला. मोदींच्या नाही, फडणवीसांच्या चेहऱ्यावर निवडून आला नाही. तुम्ही आमच्याकडून निवडून आला आणि बेईमानी करत असाल तर तुम्ही तुमच्या आईच्या दूधाचा लिलाव केला. तुम्ही तुमच्या आईला विकलंय. यावेळी फुटणं सोपं नाही. तुमच्या सेक्युरिटीला भारताचं सैन्य आणा. आम्ही मरायला तयार आहोत. ते गांडू आहेत. गांडू. आता फिरा एकटे, असं ते म्हणाले.
