अमित शाह यांचा राजीनामा घ्या; संजय राऊत यांची मागणी

थोडी जरी नैतिकता असेल तर नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणीही राऊतांनी केली. देशाचे गृहमंत्री अत्यंत अपयशी ठरले आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

अमित शाह यांचा राजीनामा घ्या; संजय राऊत यांची मागणी
संजय राऊतांचे गृहमंत्री अमित शाहांवर टीकास्त्र
| Edited By: | Updated on: Jul 17, 2024 | 4:02 PM

नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून ते आजपर्यंत किमान ४० जवानांच्या हत्या झाल्या आहेत. त्यांचं बलिदान आहे मला मान्य आहे, पण मी त्यांना हत्या म्हणतोय. देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या हत्यांना जबाबदार आहेत, असा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. थोडी जरी नैतिकता असेल तर नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणीही राऊतांनी केली. देशाचे गृहमंत्री अत्यंत अपयशी ठरले आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

ज्या दिवशी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, त्या क्षणीच काश्मीरमध्ये सर्वात मोठा हल्ला झाला. तीच विटी, तोच दांडू, तेच गृहमंत्री. जे आधी ५ वर्ष पूर्णपणे अपयशी ठरले. तेच संरक्षणमंत्री, राजनाथ सिंह , त्यांच्याकडून ठोस कारवाई झाली नाही. जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी धूमाकूळ घातला आहे. आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह हे फक्त हात चोळत बसले आहे.

अमित शाह राजकारणात व्यस्त

अमित शाह हे देशाचे गृहमंत्री असूनही देशातील निवडणुका, इतर उद्योग, धमक्या देणं यात व्यस्त आहेत. देशाचे दुश्मन मात्र मोकाट आहेत. अमित शाह हे आपल्या राजकीय विरोधकांना दुश्मन समजतात. आपल्या देशातील जवानांची हत्या करणाऱ्यांना त्यांनी दुश्मन समजलं पाहिजे.

देशाचे दुश्मन मात्र मोकाट आहेत. अमित शहा आपल्या राजकीय विरोधकांना दुश्मन समजतात. त्यांनी आमच्या जवानांची हत्या करणाऱ्यांना देशाचे दुश्मन समजले पाहिजे. अमित शहा यांनी जेवढी ताकद आपल्या राजकीय विरोधकांना खतम करण्यासाठी लावली. ती ताकद जम्मू कश्मीरमध्ये मणिपूरमध्ये देशातल्या शत्रूंना खतम करण्यासाठी लावली असती तर जवानांच्या या हत्या पाहण्याची वेळ आमच्यावर आली नसती, असंही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी शंकराचार्यांवरही भाष्य केलं. शंकराचार्यांचं म्हणणं आहे की, धर्मामध्ये राजकीय हस्तक्षेप नको. आम्ही देखील राजकीय भाष्य करणं बंद करू. हिंदू धर्मामध्ये विश्वासघाताला कुठेही स्थान नाही. हिंदू धर्मावर विश्वासघात करत असेल आणि हिंदू धर्माबद्दल कोण भाष्य करत असेल तर हे राजकारण करू नका, असंही त्यांनी म्हटलंय.

Follow Us