नाव, फोटो ते पत्ता, मतदार याद्यात मोठा घोळ, आदित्य ठाकरेंचे पुरावे देऊन गंभीर आरोप!
आदित्य ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या मेळाव्यात एक पीपीटी प्रझेंटेशन दिले आहे. यावेळी त्यांनी मतदार यादीत मोठा घोळ असल्याचा आरोप केला. हे आरोप करताना त्यांनी काही पुरावेदेखील सादर केले.

Aditya Thackeray : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तसेच मुंबई जिंकण्यासाठीची तयारी या बाबी लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने वरळी येथील NSCI डोममध्ये निर्धार मेळावा आयोजित केला. या निर्धार मेळाव्याची टॅगलाईनच संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा अशी होती. त्यामुळे या मेळाव्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईची पालिका निवडणूक जिंकण्यासाठी काय-काय करावे लागेल? याची कल्पना देण्यात आली. दरम्यान, या मेळाव्यादरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांनी एक खास प्रझेंटेशन सादर केले असून या सादरीकरणादरम्यान त्यांनी केलेल्या आरोपींची, हे आरोप करताना दाखवलेल्या पुराव्यांची सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांनी मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे, असा दावा केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी मेळावा सुरू होताच एक प्रझेंटेशन सुरू केले. मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे, असा दावा यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला. हा दावा करताना त्यांनी काही आकडेवारी सादर केली. सोबतच त्यांनी काही फोटो, मतदारांचे मतदान कार्ड सादर केले. हा कथित घोळ त्यांनी पुराव्यानीशी दाखवून दिला आहे. तसेच हा कथित घोळ थांबवायचा असेल तर गटप्रमुखांनी सावध राहायला हवे. तुमच्याकडे असलेल्या मतदार यादीतील नावांचे वाचन झाले पाहिजे. आपण या मतदारांना ओळखतो का? हे पाहिले पाहिजे, अशा सूचना केल्या.
आदित्य ठाकरे यांनी कोणकोणते आरोप केले?
आपण निवडणुका कधी येतात याची वाट पाहतोय. पण यात व्होट चोरी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. व्होट चोरी म्हणजे निवडणूक चोरी. लोकसभेनंतर महाविकास आघाडीचे सरकार येणार असे वाटत होते. पण यांनी मतदानाची चोरी केली. मला जे कोणी भेटायचे ते म्हणायचे की आदित्य काहीतरी गडबड झाली आहे, असे आदित्य ठाकरे यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले. कोणी म्हणत होतं की ईव्हीएममध्ये गडबड आहे. तर कोणी म्हणत होतं की व्हीव्हीपॅटमध्ये गडबड आहे. आता मतदार याद्यांमध्येच गडबड असल्याचे समोर आले आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
नाव, मतदाराचे लिंग चुकीचे दाखवले
विरळी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी २, ५२, ९७० मतदार होते. ते मतदार विधानसभा निवडणुकीत २, ६३, ३५२ झाले. म्हणजेच १६, ०४३ मतांची वाढ काही महिन्यात झाली. वरळी मतदारसंघात १९, ३३३ मतदारांसंदर्भात गडबड आहे. वरळीत ५०२ मतदार अशी आहेत ज्यांची नावं जवळपास सारखीच आहेत. गिरीश गजानन म्हात्रे या मतदाराच्या वडिलांचे नाव भानजी पटेल असे आहे. गौरी गगन गुप्ता, तेजश्री हडकर या महिला मतदाराचे लिंग पुरुष असल्याचे दाखवले आहे. ६४३ मतदारांचे लिंग चुकीचे दाखवल्याचे सापडले आहे, असे पुरावे साद करत आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीत गडबड आहे, असा आरोप केला.
काही मतदान कार्डावर एकाच ठिकाणी अनेक लोक राहतात
वरळी मतदारसंघात ४१७७ असे लोक मिळाले ज्यांचा काहीही ठावठिकाणा नाही. ६७ मतदार असे आहेत ज्यांच्या घराचा पत्ता फक्त झो झो झो लिहलाय. एका ठिकाणी एकाच खोलीत 38 मतदार असल्याचे दाखवण्यात आले आहे. ३८ मतदार हे एका खोलीत राहतात. हे फक्त वरळीत मतदारसंघापुरतं मर्यादित आहे. मुंबईत तर असे लाखो मतदार आहेत. काही मतदान कार्डांवर मतदारांचा फोटो नाही. काही मतदान कार्डावर एकाच ठिकाणी अनेक लोक राहतात. काही मतदारांचा मृत्यू झालेला आहे. एका मतदान कार्डावर तर मतदाराचे फक्त नाक दाखवण्यात आले आहे, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या कथित अनियमितता शोधून काढल्या पाहिजेत, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता सत्ताधारी भाजपा, शिंदे यांची शिवसेना तसेच अजित पवार यांचा पक्ष नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
