कर्जमाफीची घोषणा सोडा, किमान पीएम केअर फंडातून…; संजय राऊत कडाडले

शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

कर्जमाफीची घोषणा सोडा, किमान पीएम केअर फंडातून...; संजय राऊत कडाडले
| Updated on: Sep 29, 2025 | 11:06 AM

महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. बीड, अहिल्यानगर, सोलापूर, परभणी आणि जळगाव या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. बहुतांश भागांत उभी राहिलेली पिके आडवी झाली असून, शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील पूरस्थितीवर भाष्य केले. त्यांनी थेट राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधतला. “महाराष्ट्रामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर आहे आणि त्यामुळेच सर्वात जास्त डिझास्टर झाले आहे.” अशी टीका संजय राऊतांनी केली.

प्रति हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या

“शेतकऱ्यांना हवी असलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. आजही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. निदान आता त्यांना जगण्यापुरती तरी काहीतरी मदत मिळावी. प्रति हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने देणे गरजेचे आहे आणि शेतकऱ्यांची कर्जवसुली तात्काळ थांबवावी. कर्जमाफीची घोषणा नंतर करावी”, असे संजय राऊत म्हणाले.

“देशाच्या गृहमंत्र्यांनी अशावेळी पूरपरिस्थितीची माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाणं महत्त्वाचं असतं. पण ते उंटावरुन शेळ्या हाकतात. शाह हे क्रिकेट बोर्डाच्या निवडणुका, बिहारमधील निवडणुकीचा प्रचार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष कोण असेल हे ठरवण्यात व्यस्त आहेत, पण ते पूरग्रस्त संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर या ठिकाणी गेले नाहीत. मुख्यमंत्री दिसत असले तरी मदतीचे काय झाले?” असा सवालही राऊतांनी केला.

हा पैसा निवडणुकीत सिक्रेट फंड म्हणून वापरणार आहात का? 

“सरकारकडे उधळायला भरपूर पैसे आहेत. आमदार खासदार विकत घ्यायला. निवडणुका लढवायला त्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत. कंटेनरच्या कंटेनर भरलेले आहेत. त्यासाठी त्यांनी अंडरग्राऊंड काही जागा केलेल्या असू शकतात. पीएम केअर फंडात बेहिशोबी लाखो कोटी रुपये आहेत. त्याचा हिशोब कोणाकडे नाही. तुम्ही हा पैसा निवडणुकीत सिक्रेट फंड म्हणून वापरणार आहात का?” असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.