Solapur Ajit Pawar : हनुमान चालिसा म्हणायला घरातली जागा कमी पडतेय का? सोलापुरात अजित पवारांचा राणांसह राज ठाकरेंवर घणाघात
उद्या काही निर्णय झाला तर सर्वांच्याच सणांवर बंधने येणार. साई बाबा काकड आरती, हरिनाम सप्ताह यांच्यासह अनेक कार्यक्रम असतात. त्यामुळे त्याचा विचार केला जावा, असे अजित पवार म्हणाले.
![Solapur Ajit Pawar : हनुमान चालिसा म्हणायला घरातली जागा कमी पडतेय का? सोलापुरात अजित पवारांचा राणांसह राज ठाकरेंवर घणाघात Solapur Ajit Pawar : हनुमान चालिसा म्हणायला घरातली जागा कमी पडतेय का? सोलापुरात अजित पवारांचा राणांसह राज ठाकरेंवर घणाघात](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/30194955/ajit-1-2.jpg?w=1280)
सोलापूर : राज्यात वातावरण खराब करण्याचे काम सुरू आहे. सध्या रमजान ईद (Eid) सुरू आहे. सगळे नीट सुरू असताना हनुमान चालिसा म्हणायची तर घरीच म्हणा. घरी जागा तुमच्या कमी पडतेय का, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. सोलापूरमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर त्यांनी यावेळी टीका केली. ज्याला कोणाला हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणायची आहे, ती त्यांनी मंदिरात किंवा घरी म्हणावी, असे अजित पवार म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. राज ठाकरेंना भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे, हे सगळ्यांना समजत आहे. त्यामुळे वातावरण गढूळ करण्याचे काम हाणून पाडा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
‘कोर्टाची परवानगी’
विरोधकांकडून यूपीचे उदाहरण दिले जाते. मात्र सुप्रीम कोर्टानेच आदेश दिला आहे, की सकाळी 6 ते 10पर्यंत लाउडस्पीकरला परवानगी दिली आहे. 15 दिवस जे महत्त्वाचे सण उत्सव आहेत, त्यात ही शिथिलता दिली आहे. उद्या काही निर्णय झाला तर सर्वांच्याच सणांवर बंधने येणार. साई बाबा काकड आरती, हरिनाम सप्ताह यांच्यासह अनेक कार्यक्रम असतात. त्यामुळे त्याचा विचार केला जावा, असे अजित पवार म्हणाले. शांतता राज्यात सुरू आहे. नव्याने प्रश्न निर्माण करायची गरज काय? याने काय साध्य होणार? जातीय तेढ वाढवण्याचे काम सुरू आहे.
‘ऊसाचा एक टिपरुही शिल्लक राहणार नाही’
शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आल्याशिवाय सुबकता येणार नाही. हे माहिती आहे. म्हणूनच त्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. ऊसाचे संकट सगळ्यांसमोर आहे. म्हणूनच 1 मेपासून जे कारखाने शेतकऱ्यांचा ऊस आणतील, त्यांना टनाला 200 रुपये देण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळात घेतला आहे. 50 किमीच्या पुढे प्रती 5 रुपयेदेखील कारखान्यांना रिकव्हरी देणार, असे अजित पवार म्हणाले. सोलापूर जिल्ह्यातील ऊसाचा एक टिपरुही शिल्लक राहणार नाही, असेही ते म्हणाले.