100 पैकी 100 मार्क्स मिळवणारा आर्य किती तास अभ्यास करायचा? आर्यने सांगितला यशाचा सिक्रेट फॉर्मुला
SSC Result : कोल्हापूरच्या आर्य गौतम नाईकने दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवत यश संपादन केले. त्याने दररोज किती तास अभ्यास केला आणि त्याच्या यशामागचं सिक्रेट काय आहे हे जाणून घेऊयात.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेचा निकाल 92.09 टक्के इतका लागला आहे. तसेच 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 28 हजार 25 विद्यार्थी फॉर्म नंबर 17 भरून परीक्षेला बसले होते. त्यापैकी 22 हजार 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क्स मिळवले आहेत. यात कोल्हापूर आणि बीडमधील काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी 100 मार्क्स मिळवण्यासाठी किती तास अभ्यास केला हेही आता समोर आलं आहे.
सिध्दी कर्डीलेला 100 टक्के
बीड जिल्हा हा सातत्याने काही ना काही कारणाने चर्चेत असतो पण आज एक सकारात्मक गोष्ट बीड जिल्ह्यात घडली आहे. आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील डोंगरगण येथील इयत्ता 10 मधील विद्यार्थी सिध्दी संजू कर्डीले हिने 100 टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. या यशा बद्दल सिध्दीचे सर्वत्र कौतुक होत असून आई वडिलांनी तिचे औक्षण करून पेढे भरवून कौतुक केले आहे.
आर्यने सांगितले यशाचे सिक्रेट
कोल्हापुरातील आर्य गौतम नाईक यांनी दहावीच्या परीक्षेमध्ये 100% मार्क मिळवले आहेत. त्यामुळे आई-बाबांबरोबरच नातेवाईकांकडून आर्यच कौतुक केलं जातं आहे. लहानपणापासूनच आर्यने शाळेमधील पहिला नंबर कधीच सोडला नाही. तो दररोज दोन ते तीन तास अभ्यास करत होता, त्याचबरोबर परीक्षेच्या दरम्यान दररोज सात ते आठ तास अभ्यास करून आर्यने हे यश मिळवले आहे. अभ्यासाबरोबरच क्रिकेट खेळणे, माऊथ ऑर्गन वाजवणे, नाटकांमध्ये काम करणे असे छंद आर्यला आहेत. आर्यला वडिलांप्रमाणे सीए बनण्याची इच्छा आहे.
लातूर विभागातील 104 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
दहावीच्या निकालात लातूर विभागाने लक्ष वेधून घेतले आहे, लातूर विभागातल्या 104 विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. त्यामुळे आता या विभागातील विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62 टक्के आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41 टक्के लागला आहे.
