वाशीम ते जळगाव भटक्या कुत्र्यांचा भयंकर उच्छाद, एकाच दिवस तब्बल 35 चणांचा चावा; लोकांमध्ये प्रचंड संताप!
राज्यात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. जळगाव, लातूर, वाशीम या ठिकाणी तर कुत्र्यांनी अनेक नागरिकांचा चावा घेतला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

Maharashtra Dog Bites : राज्यात ठिकठिकाणी कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. लातूर, जळगाव, लातूर यासारख्या महत्त्वाच्या सहरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. लातूर शहरात भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. येथे एका भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी मृतदेह थेट महानगरपालिकेच्या दारात आणून ठेवला होता. मनपाच्या दरवाजात बसून नातेवाईकांनी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी नियोजन न करणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे. विलास गोरवे (वय 23) अस मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. लातूर शहरातल्या भोई गल्ली भागातही कुत्र्याने नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडलेली आहे.
जळगावात कुत्र्यांची दहशत
असाच काहीसा प्रकार जळगावात घडल आहे. जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. येथे एकाच दिवसात कुत्र्यांनी तब्बल 35 लोकांचा चावा घेतला आहे. शहरातील विविध भागांत बालकांसह वृद्धांवरही मोकाट कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. महिन्याला साधारण 900 तर वर्षभरात 10 हजाराहून अधिक डॉग बाईटच्या घटना जळगाव शहरात घडत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. चावा घेतल्यानंतर घरगुती उपचार टाळून तत्काळ रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी केले आहे. दुसरीकडे मोकाट कुत्रांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासन मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत उदासीन असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
वाशीममध्ये एकाच कुत्र्याने घेतला 25 जणांचा चावा
वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील विविध भागात एका कुत्र्याने धुमाकूळ घालत जवळपास 25 जणांना चावा घेतला आहे. जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी वाशिम येथे रवाना करण्यात आले आहे. आज सकाळी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान रिसोड शहरातील चांदणी चौक, लोणी फाटा आणि रामनगर परिसरात घडली. कुत्र्याच्या अचानक हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी झालेल्या सर्वांना उपचारासाठी रिसोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संबंधित यंत्रणा आणि प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
