अजितदादांच्या निधनानंतर तटकरेंनी घेतला पहिला सर्वात मोठा निर्णय…पोस्ट राज्यभरात व्हायरल!

अजित पवार यांच्या निधनामुळे सुनील तटकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे.

अजितदादांच्या निधनानंतर तटकरेंनी घेतला पहिला सर्वात मोठा निर्णय...पोस्ट राज्यभरात व्हायरल!
sunil tatkare
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 07, 2026 | 9:35 PM

नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रालाच धक्का बसला. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. एकीकडे जिल्हापरिषदेच्या निवडणुका चालू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. अजितदादांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा चालू झाली आहे. अजितदादा यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते मात्र या विलीनीकरणास अनुकूल नसल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे पवार कुटुंबात अजितदादा यांचे पुत्र पार्थ पवार हे शरद पवार आणि रोहित पवार यांच्यासोबत दिसले आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लक्षात घेता खासदार सुनिल तटकरे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एक महत्वाचे आवाहन केले आहे.

आनंदोत्सव साजरा न करण्याचे आवाहन

सुनील तटकरे यांनी त्यांच्या एक्स या समाजमाध्यम खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय झाला तरी आनंदोत्सव साजरा करू नये, असे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांचे मतदान शांततेत पार पडले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आपण सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल आणि दाखवलेल्या शिस्तीबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. महाराष्ट्रातील जनतेकडून माननीय अजितदादांच्या विचारांना आणि आपल्या राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे तटकरे या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

दादांच्या स्मृतींना खरी श्रद्धांजली म्हणजे…

तसेच, आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याच्या निधनामुळे आपण दुःखाच्या काळातून जात आहोत. या पार्श्वभूमीवर ९ तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे विजय सोहळे साजरे करताना संयम पाळावा, ही नम्र विनंती आहे. विजय मिरवणुका, रोड शो, फटाके फोडणे, रंग उधळणे किंवा कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक जल्लोष टाळावा, असे आवाहन तटकरे यांनी केले आहे. तसेच दादांच्या स्मृतींना खरी श्रद्धांजली म्हणजे संयम, शिस्त आणि साधेपणा राखणे हेच आहे. ही विनंती सर्वांनी मान्य करून त्याचे पालन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.