साहित्य संमेलन 3 डिसेंबरपासूनच; संमेलन स्थळ नाशिक बाहेर नेल्याने प्रकाशकांमध्ये नाराजी
नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मैफल येत्या 3 डिसेंबरपासून होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून, याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
नाशिकः नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मैफल येत्या 3 डिसेंबरपासून होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून, याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे पुढे ढकलेले गेलेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये अखेर होणार आहे. मार्च महिन्यातल्या 26 ते 28 मार्चच्या दरम्यान हे साहित्य संमेलन होणार होते. त्यासाठी निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या. त्या संबंधितांपर्यंत पोहचल्याही होत्या. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे हे संमेलन पुढे ढकलावे लागले. जुलै महिन्यात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतुकराव ठाले-पाटील यांनी पालकमंत्री छगन भुजबळांना पत्र पाठवले होते. त्यात जुलै महिन्यात साहित्य संमेलन भरवणे शक्य आहे का, अशी विचारणा केली होती. मात्र, त्यावेळेसही त्यांना नकार कळवण्यात आला. मात्र, आता दसऱ्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आढावा घेऊन दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये साहित्य संमेलन घेण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती. नोव्हेंबर महिन्यातील 19, 20, 21 या तीन तारखांचा विचार आयोजकांकडून सुरू होता. मात्र, आता या तारखात बदल करून हे संमेलन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याबाबत विचार सुरू आहे. शक्यतो 3 ते 5 डिसेंबर दरम्यान हे साहित्य संमेलन होईल, अशी शक्यता आहे. त्याची लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते.
प्रकाशकांमध्ये नाराजी
साहित्य संमेलनासाठी नोव्हेंबरची तारीख ठरवण्यात आली होती. मात्र, त्याची कल्पना संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकरांना दिली नव्हती. त्यामुळे त्यांनी कौटुंबिक कारण सांगत ही तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली. त्यामुळे आता 3 ते 5 डिसेंबर दरम्यान हे साहित्य संमेलन होणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे कोरोनाच्या नियमामुळे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम बंदिस्त सभागृहात घेण्याचे आदेश आहेत. साहित्य संमेनासाठी भव्य हॉल. विविध मंच आणि पाहुण्यांच्या निवासाची व्यवस्था पाहता भुजबळ नॉलेज सिटीमध्ये संमेलन घेण्यावर जवळपास एकमत झाले आहे. मात्र, संमेलन स्थळ शहराबाहेर नेल्याने प्रकाशकांमध्ये नाराजी आहे.
पुस्तक विक्री कमी होण्याची भीती
भुजबळ नॉलेज सिटी शहरापासून दूर आहे. येथे पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित होईल, पण शहरातील सामान्य नागरिक तिथे खास संमेलनासाठी येतील का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जर रसिकांनी संमेलनाकडे पाठ फिरवली, तर पुस्तक विक्रीही कमी होईल. त्यामुळे शहरातच संमेलन भरवावे, असा सूर अनेक जण आळवत आहेत. याबाबत प्रकाशक आपली भूमिका अधिकृतपणे मांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर खरेच संमेलन स्थळ बदलणार का, हे पाहावे लागेल.
इतर बातम्याः
शिवसेना आमदार कांदे अन् अक्षय निकाळजे यांची पोलीस आयुक्त करणार चौकशी