Sharad Pawar : अशोक खरातच्या टार्गेटवर थेट शरद पवार? तृप्ती देसाईंच्या दाव्याने राज्यात खळबळ; त्याने फोटोवर…
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी अशोक खरात प्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. खरातने शरद पवार यांच्या फोटोवर फुल्या मारल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

Trupti Desai On Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातने काळी जादू, तंत्रमंत्राच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याच्या कुकृत्याचे काही व्हिडीओही बाहेर आले आहेत. सध्या अशोक खरात पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यानंतर आता त्याच्या आर्थिक गैरव्यवहाराचीही अनेक प्रकरणे समोर येत आहेत. खरातचे प्रकरण बाहेर आल्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मंत्रिपदासाठी खरातची भेट घेतली होती, असा खळबळजनक दावा केला होता. त्यानंतर आता तृप्ती देसाई यांनी केलेल्या आणखी एका दाव्याने राज्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांनी थेट शरद पवार यांच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.
जितदादा पवार यांच्या फोटोवर काळ्या फुल्या….
अजित पवार यांच्या फोटोवर अशोक खरातने फुल्या मारल्या होत्या, असा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. तसेच अजितदादा यांच्यासोबतच आणखी एका नेत्याच्या फोटोवर त्याने फुल्या मारल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले. याबाबत बोलताना तृप्ती देसाई यांनी थेट खासदार शरद पवार यांचे नाव घेऊन खळबळ उडवून दिली. अजितदादा पवार यांच्या फोटोवर काळ्या फुल्या केल्याचे सांगितले जात आहे. आता अजित पवार हयात नाहीत. यात कोणी काही चुकीचं केलं असेल तर संबंधीताला शिक्षा मिळालीच पाहिजे, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली.
अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ नयेत यासाठी…
तसेच, अजितदादा कधीच अंधश्रद्धेला बळी पडले नाहीत. ते अशा गोष्टींना मानत नव्हते. अशोक खरातने महाराष्ट्रातील आणखी एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्याचे सांगितले जात आहे. मला वाटतंय की ते शरद पवार यांचे नाव असू शकते. कारण अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ नयेत, यासाठी अनेक नेत्यांचे प्रयत्न होते, असे म्हणत त्यांनी राज्यात खळबळ उडवून दिली.
अघोरी पूजा करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर…
पुढे बोलताना, काही जणांना अजित पवार, शरद पवार यांच्यापेक्षाही मोठे व्हायचे होते. अशा पद्धतीने खरातच्या माध्यमातून काळी जादू, अघोरी पूजा करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर त्या नेत्यांवर, संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणीही तृप्ती देसाई यांनी केली. दरम्यान, तृप्ती देसाई यांच्या या दाव्यानंतर आता नेमकं काय होणार? त्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
