
एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर आज ठाण्यात सेना भाजप बैठक होणार आहे. आजपासून जागावाटपासंदर्भात प्राथमिक आणि अधिकृत चर्चेला सुरुवात होणार आहे. 2-3 दिवसांत स्थानिक नेते चर्चा करून प्रस्ताव अंतिम करणार आणि निर्णय घेण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करणार. शिवसेना शिंदे गटाकडून चर्चेसाठी खासदार नरेश म्हस्के तर भाजपकडून आमदार निरंजन डावखरे उपस्थित राहणार आहेत.
सध्या आपण,ज्या पक्षात आहोत तिथे आम्हाला देखील वकीलीचं ज्ञान असणे महत्त्वाचं वाटत आहे, कारण ती काळाची आणि परिस्थितीची गरज आहे,अ से मिश्किल विधान आमदार काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी केले. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, नवाब मलिकांसंदर्भात अजित पवार यांनी आग्रह केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य नाही, अथवा एनसीपी महायुतीत मुंबई मनपात सोबत नसावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मांडल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूर महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. सिद्धरामेश्वर यात्रेमुळे ही निवडणूक पुढे ढकला अशी मागणी करण्यात येत आहे. यात्रेदरम्यान निवडणुकीचं मतदान आणि मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे, पण त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रेच्या प्रमुख मानकऱ्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहीत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळातील क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची कैद आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. ही शिक्षा कायम ठेवतानाच न्यायालयाने कोकाटे यांच्या अटकेचे निर्देशही दिले आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आज दिवसभरात त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी होण्याची दाट शक्यता आहे. या कायदेशीर निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच कोकाटे यांच्या मंत्रिपदावरही टांगती तलवार निर्माण झाली आहे.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वर्धा पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात कडक मोहीम उघडली आहे. दहेगाव पोलिसांच्या पथकाने हमदापूर येथे एका गोदामावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला आहे. पर्यावरणासाठी आणि पशू-पक्ष्यांच्या जीवासाठी घातक असलेल्या या मांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, नायलॉन मांजाची विक्री किंवा साठा करणाऱ्यांनी सावध व्हावे, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील अतिक्रमणांचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष तथा मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी आक्रमक पवित्रा घेत, मढी परिसरातील अतिक्रमण पाडण्यासाठी पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच, तिसगाव परिसरात सुरू असलेले अवैध कत्तलखाने तातडीने उद्ध्वस्त करावेत, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे. येत्या पंधरा दिवसांत प्रशासनाने ही अतिक्रमणे आणि कत्तलखाने न हटवल्यास स्वतः बुलडोझर आणून ते पाडून टाकू, अशा शब्दांत मरकड यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. या इशाऱ्यामुळे मढी आणि तिसगाव परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिकच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आता काँग्रेससोबत जाण्यास सकारात्मक असल्याचे चित्र दिसत आहे. मनसेचे नाशिक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संभाव्य युतीबाबत सध्या बैठकांचे सत्र सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय समोर येईल. या नव्या समीकरणात उद्धव ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ म्हणून भूमिकेत असेल, तर मनसे दुसऱ्या क्रमांकाच्या जागांची मागणी करणार असल्याचे कोंबडे यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीच्या या बदलत्या स्वरूपामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, लवकरच मनसेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही सुरू होणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत आणि मुंबईबाहेर एकत्र सभा नक्की होणार आहे. ती महाराष्ट्राची गरज आहे. फक्त मुंबई नाही, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे यांसह जास्तीत जास्त ठिकाणी ठाकरे बंधूंनी पोहोचावं आणि लोकांना संबोधित करावे
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या ऐतिहासिक ९०० वर्षांच्या परंपरेची यात्रा आणि सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक एकाच काळात आल्याने प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे. महापालिकेचे मतदान १५ जानेवारीला, तर मतमोजणी १६ जानेवारीला होणार आहे; मात्र याच काळात सिद्धेश्वर यात्रेतील मुख्य धार्मिक विधी पार पडतात. यात्रेच्या काळात सोलापुरात लाखो भाविकांची गर्दी असते, अशा परिस्थितीत निवडणूक प्रक्रिया राबवल्यास कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना पत्र लिहून निवडणूक पुढे ढकलण्याची आग्रही मागणी केली आहे. १४ ते १७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या मोठ्या सोहळ्यात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेची सांगता सभा करण्यासाठी आता अनेकांना बुडबुडे यायला लागले आहेत. यापूर्वी शिवतीर्थावर फक्त सुरुवातीची आणि सांगता सभा ही फक्त शिवसेना करत आली. शिंदे गटाचा शिवतीर्थाशी काय संबंध आहे, त्यांनी एकदा सांगावा. अमित शाहांना तुमचा पक्ष ताब्यात घेतला. तुम्ही अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी आहात, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली.
दुखापतग्रस्त क्रीडापटूंंसाठी केईएम रुग्णालय पहिले शासकीय उपचार केंद्र ठरणार आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते क्रीडा दुखापत व पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण करण्यात आले आहे. 25 बेड चे रुग्णशय्यांचा विशेष कक्ष; एकाच छत्राखाली उपचार व पुनर्वसन सुविधा उपलब्ध असणार आहे. आर्थोस्कोपी सर्जन, फिजिओथेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, आहारतज्ज्ञांची टीम उपलब्ध असणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक उपचार पद्धतींचा समावेश देखील असणार आहे. खासगी क्षेत्राच्या सहकार्यामुळे क्रीडापटूंंसाठी मोठा आरोग्यदृष्ट्या दिलासा आहे.
ठाण्यातील मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महत्वाची बैठक घेतली, या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले गेले. ठाण्याची चर्चा खासदार नरेश म्हस्के, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर साठी खासदार श्रीकांत शिंदे आणि गोपाळ लांडगे, मीरा भाईंदर साठी मंत्री प्रताप सरनाईक, नवी मुंबई साठी खासदार नरेश म्हस्के तर वसई विरार महापालिकेसाठी रवींद्र फाटक भाजप सोबत चर्चा करणार. उद्या पासून स्थानिक पातळीवर बैठका घेऊन जागावाटप वर चर्चा करणार आणि अडचण असेल तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण हे नेते लक्ष घालणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय युवा खेळाडू ,आक्रमक डावखुरा सलामीवीर साहील पारख याची आय पी एल २०२६ च्या हंगामासाठी निवड करण्यात आली आहे. आय पी एल लिलावात, ३० लाख या रकमेच्या बेस प्राइस -कमीतकमी बोली किंमत वर दिल्ली कॅपिटलने साहिल पारखला समाविष्ट केलं. चेन्नई संघातील रामकृष्ण घोषसह साहिल पारीक नाशिकचे दोन खेळाडू आयपीएल मध्ये सहभागी झाले आहेत.
परभणीत जिल्हाप्रमुखांकडून निष्ठावान शिवसैनिकांना डावलण्यात येत असल्याची शिवसैनिकांनी तक्रार केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षांतर्गत कलह समोर आला आहे. निष्ठावंतांना आणि जुन्या जाणत्या शिवसैनिकांना पालिका निवडणुकीतून बाजूला ठेवलं जात असल्याची तक्रार केली.
पुणे पोलिसांनी गोवा, आसाम, मुंबईत छापे टाकले आहेत. 31 डिसेंबर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गांजा, पार्टी ड्रग्स, सिंथेटिक ड्रग्स जप्त केले. पुण्यासह, पिंपरी चिंचवड आणि मुंबईत पुणे पोलिसांनी छापे टाकले आहेत. कारवाईत ६ जणांना पुणे पोलिसांनी अटक केली. आज दुपारी पुणे पोलिस पत्रकार परिषदेतून माहिती देणार आहेत.
पुसेगाव हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीला 1100 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यावर्षीचा पुसेगाव हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचा मान नातेपुते येथील ‘सचिन’ आणि चांदेगाव येथील ‘लक्षा’ या बैल जोडीला देण्यात आला. हिंदकेसरी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यत प्रेमींची गर्दी जमली.
रात्री दिलेला जाणाऱ्या विमानांना दोन ते तीन तास उशीर होत आहे. काल दिल्लीसाठी उड्डाण करणाऱ्या दहा विमानांना धुक्यामुळे उशीर झाला आहे. प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धुक्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे
अंबरनाथमध्ये भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या खाजगी कार्यालयावर करण्यात आला गोळीबार. सहा राउंड अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आले फायर. अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अंबरनाथ नवीन भेंडी पाडा परिसरातील घटना. सध्या गोळीबार झालेल्या ठिकाणी संपूर्ण रस्ता पोलिसांकडून सील करण्यात आला
माजी नगरसेवक गिरजाराम हाळनोर, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे, माजी नगरसेविका सुमित्रा हाळनोर, छाया राऊत आणि त्यांचे पती विलास राऊत यांनी मंगळवारी उद्धवसेनेचा राजीनामा देत शिंदेसेनेत प्रवेश केला. महापालिका निवडणूक जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शिंदेसेनेने उद्धवसेनेला धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
थंडीची चाहूल लागताच हवामानात अचानक बिघाड; दादर परिसर धुक्यात. दादर चौपाटीवर पहाटेपासून स्मॉग व धुरकट वातावरण. चौपाटीवरून दिसणाऱ्या इमारती धुकं–धुरामुळे धूसर. दादर परिसराचा आजचा AQI 155; तर सायंकाळपर्यंत 180 पार जाण्याचा अंदाज. काही ठिकाणी वाढत्या प्रदूषणामुळे नागरिक पुन्हा मास्कच्या वापराकडे
महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे शहरात राजकीय जाहिरात बाजी करणारे फलक लावण्याबरोबरच मतदारांना आकर्षित करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे संबंधित फलक आणि कार्यक्रमांसाठी कुठलीही परवानगी महापालिका कडून घेण्यात आलेले नाही त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल त्यांच्यावरील खर्च संबंधित पक्षाच्या खर्चामध्ये कार्यरला जाईल असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. इच्छुक उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्रासाठी एक खिडकी योजना उमेदवारांचा खर्च मर्यादा लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथकाची निर्मिती मतदार यादी घरोघरी पोहोचवण्यापासून ते प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंतची तयारी पूर्ण करण्याच्या महापालिकेने आतापासूनच भर दिला आहे.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर आता इच्छुकांची उमेदवारीसाठी धडपड सुरू झाले आहे त्यातच महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या तब्बल 35 ते 40 माजी नगरसेवकांचा उमेदवारी तस पत्ता कट होणार असल्याचे समोर आले आहे प्रामुख्याने बदललेली प्रभाग रचना त्यामधील आरक्षण यामुळे बदललेली गणिते आणि काही माजी नगरसेवकांची अकार्यक्षमता या कारणांमुळे सर्वांना घरी बसायला लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. मुंबई, नागपूर, पुणे, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नांदेड, परभणी, लातूर, नाशिक महापालिका अशा राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत. 15 जानेवारीला मतदान होईल तर 16 तारखेला निकाल लागेल. मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसी राज्यात मतदान होईल. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झालीये. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले असून राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे. काहीही करून पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता आणायची असल्याचे कालच मोठे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. काही ठिकाणी महायुती म्हणून निवडणुका लढणार असल्याने महायुतीने स्पष्ट केले. काल संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. महाविकास आघाडीसोबत मनसे निवडणूक एकत्र लढणार का? हे स्पष्ट होईल. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.