सोनम वांगचुकसाठी उद्या रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; वेळेसह ठिकाणही ठरलं…
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रामरक्षा पठण आंदोलन केले. यावेळी संजय राऊत, चंद्रकांत खैरे, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी हजर होते. या आंदोलनावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे. उद्या मुंबईत शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
उद्धव ठाकरे सोनम वांगचुक यांच्यासाठी आंदोलन करणार
उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाची घोषणा करताना म्हटले की, ‘उद्या आम्ही मुंबईत आंदोलन करतोय. सोनम वागंचुक आणि दीपकेंना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत उद्या आंदोलन करतोय. अनेकांनी म्हटलं दिल्लीत जाणार का. मी म्हटलं जाईन. पण कोरडा जाणार नाही. आधी मुंबईत आंदोलन करेल. त्यानंतर मी जाईल असं सांगितलं. 20 दिवसांपूर्वी वांगचुक घरी येऊन भेटून गेले. दीपकेशी माझं बोलणं झालं आहे. मी सर्वांना विनंती करतो, जसा मंदिराचा लढा आहे. तसा उद्याचा लढा देशाचं भवितव्य असलेल्या युवकांसाठीचा लढा आहे. ज्यांना दडपशीही मान्य नाही त्यांनी उद्या मुंबईत या. आमंत्रण देतोय.
भाजपला सवाल करा
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘बाळासाहेबांचे विचार सोडल्याचा आरोप होतात. मंदिर चोराला आम्ही जाब विचारायला उभे आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही भाजपला सवाल करा. त्यांच्या घरचे पाणके होऊ नका. गद्दाराच्या अंगात हिंदुत्वाचं रक्त असेल तर मंदिर चोरांविरोधात भूमिका स्पष्ट केली पाहिजे. जमलेल्यांच्या डोक्यावर भगव्या टोप्या नाहीत, मी काही भगवा झेंडा, भगवा झब्बा गंमत म्हणून घेतला नाही. ही काही नाटक कंपनी नाही.’
संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार
उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘भाजपने आमच्यासोबत गद्दारी केली. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. तेव्हा हिंदुत्व सोडल्याचं बोलत होते. आता भाजपला विचारतो तुम्ही का हिंदुत्व सोडलं. एसआयटी वगैरे हे थोतांड आहे. एक विषय निर्माण झाला तर दुसरा विषय काढतात. भांडवल केलं जातं. मंदिराचा प्रश्न सोडणार नाही. महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलन करू. अयोध्या, काशी विश्वनाथला जाणार. तिथे महाआरती करणार. चौकशीची थेरं करू नका. नाटकं करू नका. प्रामाणिकपणे निकाल लावायचे असेल तर निवृत्त न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली समिती स्थापन करा. अभय ओकांसारखे निवृत्त न्यायाधीश नेमा. दूध का दूध पानी का पानी होईल.’
