बाबरी पाडली तेव्हा बाळासाहेबांना…उद्धव ठाकरेंनी फोडलं त्या फोनचं गुपित, भाषणात संगळं सांगितलं!
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा आंदोलन झाले. यावेळी त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. तसेच बाबरी मशीद प्रकरणात नेमकं काय घडलं होतं? त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी काय भूमिका घेतली होती, याबाबत माहिती दिली.

Uddhav Thackeray Protest : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने नागपुरात रामरक्षा आंदोलन केले. आपल्या या आंदोलनात त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. आम्ही जय श्री राम, जय शिवराय बोलणारे कट्टर हिंदू आहोत, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आम्ही हिंदुत्त्व सोडलेले नाही. पण भाजपाचे हिंदुत्त्व आम्हाला मान्य नाही, असंही यावेळी त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यांच्या हिंदुत्त्वाबाबत बोलताना ठाकरे यांनी बाबरी मशीद आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचे उदाहरण यावेळी दिले.
बाळासाहेबांना तेव्हा फोन आला होता…
बाबरी पडली तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उभे होते. एक फोन आला होता. तेव्हा हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्याचा मला गर्व आहे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा त्यांनी बुलंद केली. अनेक कारसेवकांनी बलिदान दिलं. अपंगत्व आलं, अशी आठवण यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितली.
आम्ही लुटारूंच्या विरोधात आहोत
तसेच, या चोरांच्या पोटापाण्यासाठी आम्ही संघर्ष केला नव्हता. मंदिर वही बनायेंगे अशी घोषणा दिली गेली. पण राम मंदिर लुटण्यासाठी राम मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे का? असा रोखठोक सवालही त्यांनी केला. आम्ही लुटारूंच्या विरोधात आहोत. आमची चेष्टा मस्करी करण्यापेक्षा फडणवीस यांनी लुटणाऱ्यांच्या बाजूने की राम रक्षा करणाऱ्यांच्या बाजूने आहेत हे स्पष्ट करावे, असे खुले आव्हानही त्यांनी फडणवीस यांना दिले.
वर्गातील मॉनिटरसारखं बोलू नका…
उद्धव ठाकरे यावेळी तरी पूर्ण रामरक्षा म्हणतील, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. त्याला उत्तर देताना, हे आंदोालन राम रक्षा पाठ आहे की नाही हे बघण्यासाठी नाही. एखाद्या वर्गातील मॉनिटरसारखं बोलू नका. आज राम भक्तांना रामाचं संरक्षण करण्याची वेळ येत आहे. भाजपच्या कारभारात ही रामरक्षा करावी लागत आहे. यापेक्षा दुर्देव कोणतं. अयोध्या, केदारनाथ मंदिर आदी ठिकाणी घोटाळे झाले. उज्जैनमध्ये घोटाळा झाला. अयोध्येत जमीन घोटाळा झाला. साधू आज राग व्यक्त करत आहेत, असा पलटवार त्यांनी फडणवीस यांच्यावर केला.
