भागवत साहेब हेच का तुमचं हिंदू राष्ट्र…?, संघ भूमीत उद्धव ठाकरे गरजले, सरसंघचालकांना दोन प्रश्न
अयोध्येच्या राम मंदिरात झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाचं 'रामरक्षा' आंदोलन सुरू आहे. आज नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करण्यात आलं, यावेळी उद्धव ठाकरे यांनी आरएसएस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अयोध्येमधील राम मंदिरात झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात ‘रामरक्षा’ आंदोलन सुरू आहे. आज नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं ‘रामरक्षा ‘ आंदोलन पार पडलं, यावेळी आयोजित सभेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशासह राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवत उद्धव ठाकरे यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना काही प्रश्न विचारले आहेत.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
‘मला मोहन भागवत यांना विचारायचं आहे. एकदोन प्रश्न विचारले पाहिजेत. कारण हे नागपूर आहे. आलोय तर प्रश्न विचारले पाहिजेत. भागवत साहेब ज्या पद्धतीने भाजप वागत आहे. मंदिर लुटलं जात आहे. पेपर फुटत आहेत. पक्ष तर फोडले जात आहे. आता मंदिरातील तिजोऱ्या फोडल्या जात आहेत. हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं काय? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आमचं हिंदु राष्ट्र हे नव्हे. आमच्या हिंदुराष्ट्रात राम राज्य अपेक्षित आहे. शिवशाही अपेक्षित आहे. गोरगरीबांना विद्यार्थ्यांना न्याय देणारं आमचं हिंदू राष्ट्र आहे. कंत्राटदारांना अभय देणारं हे आमचं हिंदू राष्ट्र असू शकत नाही. भागवत साहेब तुम्ही म्हणाला होता, मुस्लिम या देशातीलच आहे. हिंदुंनी दोन ते तीन अपत्य जन्माला घातली पाहिजे. मग ही आपत्य जन्माला घातली, परीक्षेचे पेपर फुटले, अनेकांनी आत्महत्या केल्या, त्याचं काय करणार? आणखी अपत्य जन्माला घालून तुम्ही त्यांना असंच चिरडणार? हे हिंदू राष्ट्र आम्हाला अपेक्षित नाही, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
बाबरी पडली तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उभे होते. एक फोन आला होता. तेव्हा हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्याचा मला गर्व आहे. गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा त्यांनी बुलंद केली. अनेक कारसेवकांनी बलिदान दिलं, काहींना अपंगत्व आलं. त्यांनी हा संघर्ष या चोरांच्या पोटापाण्यासाठी केला नव्हता, असा टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
