विदर्भात मोठा राजकीय भूकंप होणार, या पक्षांना बसणार सर्वाधिक हादरा, आमदार आणि खासदार… बड्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ
विदर्भात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा आहे. अनेक पक्षांतील आजी-माजी आमदार, खासदार व दिग्गज नेते शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाने 'मिशन विदर्भ' हाती घेतले असून, पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न आहे.

बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता शिंदे गटाने मिशन विदर्भ हाती घेतल्याचं दिसत आहे. विदर्भातील अनेक नेत्यांना आपल्या गळाला लावण्यासाठी शिंदे गटाचे सापळा रचला असल्याचंही बोललं जात आहे. विदर्भात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असल्याची चर्चा होती. या चर्चेला आता शिंदे गटाच्या बड्या नेत्यानेच बळ दिलं आहे. शिंदे गटाचे अकोल्याचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार राजन साळवी यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे. विदर्भात येत्या काळात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा राजन साळवी यांनी केला आहे. विदर्भातील अनेक पक्षातील आजी-माजी खासदार आणि आमदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हे सर्वजण शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा राजन साळवी यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अलीकडेच बच्चू कडू यांच्या रूपाने शिंदेंच्या शिवसेनेला विदर्भात मोठा नेता गळाला लागला आहे. तर आगामी काळात शिंदेंची शिवसेना विदर्भात आपली ताकद वाढवणार असल्याचे संकेत पक्षाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात विदर्भातील अनेक पक्षातले माजी खासदार, आमदार या सोबतच लोकसभा-विधानसभा लढलेले अनेक दिग्गज नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट पक्षाचे माजी आमदार राजन साळवी यांनी केला आहे. अकोला येथे माध्यमांशी बोलताना साळवी यांनी हा दावा केला आहे.
खळबळ उडवली
राजन साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेचे अकोला जिल्हा संपर्कप्रमुख आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांनी संघटनात्मक बांधणीसाठी अकोला जिल्ह्याचे अनेक दौरे केले आहेत. तर श्रीकांत शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या ते अकोला जिल्ह्यात आले आहेत. यावेळी त्यांनी हा बॉम्ब टाकून राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
श्रीकांत शिंदे विदर्भ दौऱ्यावर
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना संघटना बूथ पातळीपर्यंत मजबूत करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचा दोन महिन्यांचा राज्यव्यापी संवाद दौरा सुरू होत आहे. हा दौरा 16 मे ते 15 जुलै या कालावधीत 22 जिल्हे आणि 100 हून अधिक विधानसभा मतदारसंघांत तीन टप्प्यांत पार पडणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
दौऱ्याचे टप्पे आणि प्रमुख जिल्हे
पहिला टप्पा (मे): यात प्रामुख्याने उत्तर आणि मध्य महाराष्ट्रावर भर असून नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
दुसरा टप्पा (जून): जळगाव, नंदुरबार, यवतमाल, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली.
तिसरा टप्पा (जुलै): बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर.
