वाशिम : वाशिम (Washim) जिल्हात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. वाशिमच्या मानोरा, रिसोड, मालेगांवसह अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नदी, नाले काठोकाठ भरून वाहत आहेत. मानोरा तालुक्यातील अरुणावती नदीला (River) ही मोठा पूर आलायं. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मुसळधार पावसामुळे (Heavy rain) वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला सोनाळा प्रकल्प देखील ओव्हर फ्लो झालायं.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्प 100 टक्के भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होत आहे. या विसर्गामुळे मंगरुळपिर तालुक्यातील शेलुबाजार येथील अडाण नदीला मोठा पूर आलायं. यामुळे नदी काठाच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
वाशिमच्या उकळी शिवारातील पैनगंगा नदीच्या पुरात एका महिलेचा मृतदेह वाहून आल्याची घटना 25 जुलैला सायंकाळी उघडकीस आली. सदर मृत महिलेचं वय अंदाजे 25 ते 30 वर्षे आहे. पोलिसांनी पैनगंगा नदीतून महिलेचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढला असून तो शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. सदर मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पुढील तपास अनसिंग पोलीस करीत आहेत.