
28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातावर अनेकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील या अपघातावर शंका उपस्थित करत मोठं विधान केलं आहे, काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानातील अतिरिक्त इंधन, तसेच ब्लॅकबॉक्स डॅमेज होणे, अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीला होणारा उशिर असे काही प्रश्न त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केले आहेत. दरम्यान या घटनेनंतर रोहित पवार सातत्याने अजित पवार यांच्या अपघाताबद्दल संशय व्यक्त करत आहेत. घातपाताचा संशय व्यक्त करत आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना तुम्ही हे सर्व प्रश्न उपस्थित करत आहात तुम्हाला भीती वाटत नाही का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला, यावर बोलताना रोहित पवार भावुक झाल्याचं पहायला मिळालं.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
मला भीती वाटत नाही, पण माझ्या कुटंबाला भीती वाटतेय. 100 टक्के भीती वाटते. एवढ्या मोठ्या लोकांना अंगावर घेत आहे, यात एवढी मोठी लोकं असतील, ही घटना घडवायला एवढी मोठी लोकं त्यात असू शकतात, यांना अंगावर घेत असशील तर आम्हाला तुझी काळजी वाटते. हे मला माझ्या पत्नीने, मुलांनी, आईने आणि सासऱ्यानेही बोलून दाखवलं आहे.
जवळच्या लोकांनीही बोलून दाखवलं आहे. पण आपण नाही लढणार तर कोण लढणार. हा भावनिक विषय आहे. महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठीही. भीतीपोटी आम्ही थांबलो, शांत बसलो तर मराठी माणसं कशाचे आणि आम्ही पवार कसले? आम्ही लढत आहोत. भीती आहे, या बाबत आम्ही काही गोष्टींची दक्षता घेतली आहे. काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे, काही संरक्षण घेता येईल का वगैरे, पण हा कार्यकर्त्यांचा विषय आहे, असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.