Madhu Dandavate : बाथरूममध्ये कपडे धूत असतानाच केंद्रीय मंत्रीपदाची आली ऑफर, रेल्वेमंत्री बनताच घेतला मोठा निर्णय; मधु दंडवतेंबद्दल हे माहीत आहे का?
राज्य मंत्रिमंडळाची आत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला.

नुकताच राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांनी सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे मधु दंडवते कोण होते? जाणून घेऊया…
आज भारतीय रेल्वेच्या जनरल (द्वितीय श्रेणी) डब्यांमध्येही गाद्या असलेल्या सीट पाहायला मिळतात. पण आजपासून सुमारे ४० वर्षांपूर्वी गादी असलेल्या सीटवर बसण्याची संधी फक्त एसी डब्यातील प्रवाशांनाच मिळत असे. स्लीपर डब्यांमध्ये गाद्या असलेल्या सीट देण्याचे श्रेय महान समाजवादी नेते आणि माजी रेल्वेमंत्री मधू दंडवते यांना जाते. लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना जनरल डब्यांमध्ये गाद्या असलेल्या सीटची सुरुवात झाली.
कपडे धुताना मंत्रीपदाची ऑफर
मधू दंडवते आपले कपडे स्वतःच धुत असत. १९७७ सालची ही गोष्ट आहे, मधू दंडवते दिल्लीतील पटेल भवनच्या बाथरूममध्ये आपले कपडे धुत होते. तेवढ्यात तिथे अधिकारी विठ्ठलभाई पटेल पोहोचले. तिथे येताच त्यांनी मधू दंडवते यांना सांगितले की, त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. ते म्हणाले, ‘थोड्याच वेळात पंतप्रधान मोरारजी देसाई मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत, तुम्ही हे कपडे धुणे थांबवा आणि लवकर तयार होऊन शपथविधी समारंभाला चला.’ घाईघाईत मधू दंडवते आपले भिजलेले कपडे पटेल भवनच्या बाथरूममध्ये तसेच सोडून तयार झाले आणि त्यांनी रेल्वेमंत्री पदाची शपथ घेतली.
मोरारजी देसाई यांनी मधू लिमये यांना विचारले
यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी समाजवादी नेते मधू लिमये यांना विचारले होते की, ‘मला मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस आणि तुमच्यापैकी कोणत्याही दोघांना मंत्रिमंडळात घ्यायचे आहे.’ यावर लिमये यांनी त्यांना सांगितले की, तुम्ही मधू दंडवते आणि जॉर्ज यांना मंत्री बनवा. लिमये यांना वाटत होते की, जर जॉर्ज फर्नांडिस यांना मंत्री बनवले नाही तर ते वारंवार रेल्वे संप घडवून आणतील, ज्यामुळे मोरारजी देसाई यांना सरकार चालवण्यात अडचण येईल.
मधू दंडवते यांनी रेल्वेमंत्री होताच घोषणा केली, ‘मंत्र्यांनी राजा-महाराजांसारखे वागावे, असे मला अजिबात वाटत नाही. ही सरंजामशाही प्रथा संपुष्टात आली पाहिजे.’ त्यांनी रेल्वेमध्ये आधीपासून सुरू असलेला विशेष कोटा रद्द केला. तसेच, त्यांनी सर्व जनरल मॅनेजरना एक परिपत्रक जारी केले, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिले होते की, ‘जर कोणी स्वतःला माझा मित्र किंवा नातेवाईक सांगून विशेष सुविधा मागत असेल, तर ती नाकारण्यात यावी.’
मधू दंडवते नेहमी म्हणायचे की, अनेकदा जी चुकीची कामे होतात, मग तो भ्रष्टाचार असो वा आपल्या नातेवाईकांबाबतचा पक्षपात असो, ती वरून सुरू होतात आणि तळापर्यंत झिरपतात. त्यामुळे वरच्या पातळीवर भ्रष्टाचार न होणे अत्यंत गरजेचे आहे.
