pune ZP election : पुण्यातील सर्वात उंच मतदान केंद्र,लोकशाहीच्या महोत्सवासाठी रायरेश्वरावर मतदान कर्मचाऱ्यांची चढाई
रायरेश्वराच्या प्राचीन मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसह 'हिंदवी स्वराज्याची' शपथ घेतली होती. याच लोकशाहीच्या महोत्सवात लोकांना मतदानाचा अधिकार बजावता यावा याकरीता रायरेश्वर किल्ल्याच्या पठारावरील मतदान केंद्रासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांनी उभी चढण आज सर केली...

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणूकांसाठी उद्या दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.या साठी राज्यातील १२ जिल्हा परिषदेच्या निवडणूकात मतदानाची तयारी सुरु झाली आहे. पुण्यातील सर्वांत उंचावर असलेल्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावरील पठरावर असणाऱ्या रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना अवघड चढाई करीत रायरेश्वरपर्यंत पायी प्रवास करत मतदारांसाठी खिंड लढली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी,२७ एप्रिल १६४५ रोजी पुण्याच्या भोर तालुक्यातील रायरेश्वराच्या प्राचीन मंदिरात आपल्या सवंगड्यांसह ‘हिंदवी स्वराज्याची’शपथ घेतली होती.
पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या दुर्गम अशा रायरेश्वर मतदान केंद्रावर पायथ्यापासून पायी चालत निवडणूक कर्मचाऱ्यांनी हे मतदान केंद्र गाठले. यावेळी उभी चढण असलेल्या लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने चढताना त्यांची पार दमछाक झाली.मात्र लोकशाहीच्या या उत्सवात जनतेला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्यांनी हे कर्तव्य पार पाडले. त्यातून आपल्याला एक वेगळा अनुभव आणि आनंद मिळाल्याच्या उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी स्पष्ट दिसत होता.
भोर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर येथील मतदान साहित्य वाटप केंद्रावरून आज मतदान पथके मतदान केंद्राकडे रवाना झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० वाजता मतदान साहित्य वाटपास सुरूवात झाली. यावेळी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली.
१६० मतदारांसाठी या मतदान केंद्राची स्थापना
रायरेश्वर हे पुण्यातील सर्वांत उंचावर असलेले मतदान केंद्र असून १६० मतदारांसाठी या मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. भोरपासून ४२ किलोमीटर अंतरावर असलेल्या या दुर्गम मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी रायरेश्वरच्या पायथ्यापर्यंत वाहनाने जाता येते. रायरेश्वराच्या पायथ्यापर्यंत ४० किलोमीटर प्रवास करावा लागतो. त्यानंतर एक तास पायी वाटचाल करून लोखंडी शिडीच्या सहाय्याने मतदान केंद्रापर्यंत पोहोचता येते.
मतदान कर्मचाऱ्यांनी हे अंतर पूर्ण करून मतदान केंद्रावर साहित्य पोहोचविले. देशाच्या प्रत्येक पात्र मतदाराला लोकशाहीच्या या महोत्सवात सहभागी होता यावे यासाठी या कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. जिल्ह्यासह राज्याच्या इतरही भागात मतदान कर्मचारी अशा विविध आव्हानांचा सामना करीत नागरिकांना या लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात, असे भोरचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी म्हटले आहे.
