कलिंगडमुळे पुन्हा भीतीचं वातावरण, 15 वर्षीय मुलाचा थेट मृत्यू; तिघांची…नेमकं काय घडलं?
कलिंगड खाल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जाणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा अशीच एक घटना घडली आहे. एक लहान मुलाचा मृत्यू झाल आहे तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कुटुंबाचा कलिंगड खाल्याने मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मुंबईत घडलेल्या कलिंगड दुर्घटनेनंतर आता छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कापून ठेवलेले कलिंगड खाल्ल्याने १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर इतर तीन मुले गंभीर आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आनंदाच्या घरात पसरली शोककळा
ही घटना जांजगीर-चांपा जिल्ह्यातील घुरकोट गावात घडली आहे. मृत मुलाचे नाव अखिलेश धिवर (१५) असून तो पोडी दल्हा गावचा रहिवासी होता. आपल्या मामाच्या घरी एका कार्यक्रमासाठी तो आला असताना ही दुर्घटना घडली. अखिलेशसोबत पिंटू (१२), हितेश (१३) आणि एका ४ वर्षांच्या मुलानेही ते कलिंगड खाल्ले होते.
बऱ्याच वेळापूर्वी कापून ठेवलेले फळ ठरले कारणीभूत?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी कापून ठेवलेले कलिंगड मुलांनी संध्याकाळी खाल्ले होते. फळ खाल्ल्यानंतर काही तासांतच मुलांना उलट्या, जुलाब आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अखिलेशला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सध्या इतर तीन मुलांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विषबाधेचा संशय, चौकशीचे आदेश
कापलेले फळ दीर्घकाळ उघड्यावर ठेवल्यामुळे त्यात बॅक्टेरिया तयार होऊन ‘फूड पॉयझनिंग’ (विष) झाली असावी, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मुलांनी कलिंगडासोबत चिकनचेही सेवन केले होते, अशी माहिती समोर येत असून पोलीस अधिक तपास करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
फळे खाताना काळजी घ्या
उन्हाळ्याच्या दिवसात कापलेली फळे, विशेषतः रस्त्यावरील किंवा दीर्घकाळ उघड्यावर ठेवलेली फळे खाणे अत्यंत धोकादायक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. फळे कापल्यानंतर लगेच खाणे किंवा ती योग्य प्रकारे झाकून ठेवणे आरोग्यासाठी सुरक्षित असते.
