कुवेतमधून केरळला आलेल्या विमानात 20 मृतदेह, काय आहे प्रकरण ?
कुवेतमधून 20 भारतीय नागरिकांचे मृतदेह विशेष विमानाने केरळमधील कोची विमानतळावर दाखल झाले. पश्चिम आशियातील तणावामुळे उद्भवलेल्या विमानसेवा व्यत्ययांमुळे या मृतदेहांना मायदेशी आणण्यास विलंब झाला होता. मृतदेहांच्या आगमनामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली. विमानतळावरून मृतदेह त्यांच्या मूळ गावी, केरळ आणि तामिळनाडूत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

कुवेतमधून एक विमान मंगळवारी केरळच्या कोची विमानतळावर आलं, पण आतलं दृश्य अतिशय हादरवणारं, भयावह होतं. कारण या विमानात एकही प्रवासी नव्हता, तर होते फक्त मृतहेद.. 20 लोकांचे मृतदेह. कुवेतमध्येजीव गमावणाऱ्या 20 भारतीयांचे मृतदेह मंगळवारी केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. हवाई सेवेतील व्यत्ययांमुळे या लोकांचे मृतदेह मायदेशी परत आणण्यास बराच वेळ लागला. कुवेत एअरवेजचे विशेष विमान KU5632 कोलंबोमार्गे कोची येथे दाखल झाले. पण त्या विमानात एकही प्रवासी बसलेला नव्हता, हे विमान विशेषत: मृतदेह आणण्यासाठी चालवण्यात आलं होतं. मात्र विमानातील त्या डेडबॉडीजमुळे सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत कुवेतमध्ये विविध घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या किमान 20 भारतीयांचे मृतदेह मंगळवारी या विशेष विमानाने कोची विमानतळावर दाखल झाले. या घटनेचा तेथील सुरू असलेल्या युद्धाशी संबंध नसला तरी, पश्चिम आशियातील सध्याच्या तणावामुळे विमानसेवेच्या वेळापत्रकात व्यत्यय आल्याने मृतदेह पाठवण्यास बराच विलब झाला होता. आपल्या आप्तजनांच्या मृत्यूचं दु:ख त्यांचे कुटुंबीय सहन करत असतानाच, मृतदेह आणण्यासही वेळ लागल्यामुळे परिस्थिती आणखीनच हृदयद्रावक झाली.
मृतदेह मूळ गावी पाठवण्याची प्रक्रिया सुरू
कुवेतहून आलेलं हे विमान कोची एअरपोर्टवर उतरताच, सर्व 20 मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मृतांपैकी बहुतेक जण केरळमधील कोझिकोड, अलाप्पुझा आणि कोट्टायम जिल्ह्यांचे रहिवासी होते. याव्यतिरिक्त, काहींटे मृतदेह हे रस्तेमार्गाने तामिळनाडूलाही पाठवायचे असून, त्यासाठी रुग्णवाहिका आणि इतर आवश्यक व्यवस्था आधीच करण्यात आली आहे अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.
कुवेतमध्ये अडकलेले हे मृतदेह त्यांच्या मायभूमीत येणं बऱ्याच काळापासून प्रलंबित होतं. मध्य-पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धामुळे, कुवेतहून होणारी हवाई सेवा विस्कळीत झाली होती, ज्यामुळे त्या नागरिकांचे मृतदेह मायदेशी परत येण्यास विलंब झाला होता. अखेर काल हे विमान भारतात आलं आणि सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, त्या लोकांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत अशी माहिती समोर आली.
