अमेरिका की इराण.. संकट काळात भारतानं कोणावर विश्वास ठेवावा? कोणाची बाजू घ्यावी? जाणून घ्या C-VOTER चा सर्व्हे काय सांगतो?
अमेरिका, इराण, इस्त्रायल युद्ध जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन चाललंय का? या युद्धामुळे जगावर आण्विक युद्धाचं ढग दाटलंय का? या युद्धाचं भविष्य काय असणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं सी व्होटरने आपल्या या सर्व्हेमधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

अमेरिका, इराण, इस्त्रायल युद्ध जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन चाललंय का? या युद्धामुळे जगावर आण्विक युद्धाचं ढग दाटलंय का? या युद्धाचं भविष्य काय असणार? आणि या युद्धाचा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? या सर्वा प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी भारताच्या टीव्ही इतिहासामध्ये पहिल्यांदाच सी-व्होटरकडून एक वॉर सर्व्हे मार्च महिन्यात करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये देशातील सर्वच राज्यांमधील प्रत्येक जिल्ह्यातील लोकांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. चला तर मग जाणून घेऊयात भारतामधील जनतेला या यु्द्धाबाबत नेमकं काय वाटतंय?
अमेरिका, इराण युद्धामध्ये भारतानं तटस्थ रहावं असं भारतामधील 60 टक्के लोकांना वाटत आहे. मात्र जर भारतावर दोन्ही देशांपैकी एका देशाची निवड करण्याची वेळ आलीच तर भारतानं इराणची साथ द्यावी असं 74 टक्के भारतीयांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. हा आकडा मार्च महिन्यातील चौथ्या आठवड्याचा आहे, यापू्र्वी मार्चच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात देखील सर्व्हे करण्यात आला होता, भारतीय लोकांचं मत बदलत असल्याचं यावरून दिसून येत आहे.
संकट काळात भारतानं कोणावर विश्वास ठेवावा?
दरम्यान संकट काळात भारतानं कोणावर विश्वास ठेवावा इराण की अमेरिका असा प्रश्न देखील या सर्व्हेमध्ये विचारण्यात आला होता, या प्रश्नाला उत्तर देताना अनेकांनी आपली पसंती अमेरिकापेक्षा इराणला दर्शवली आहे. जसं जसं हे युद्ध लांबत आहे, तसा तसा भारतीय लोकांचा इराणवरील विश्वास वाढत असल्याचं देखील या सर्व्हेमधून समोर आलं आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात 26 टक्के लोकांनी, तिसऱ्या आठवड्यात 26 टक्के लोकांनी तर चौथ्या आठवड्यात 15 टक्के लोकांनी भारताने अमेरिकेवर विश्वास करायला पाहिजे असं म्हटलं आहे. मात्र या उलट परिस्थिती आपल्याला इराणबाबत पाहायला मिळत आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात 27 टक्के लोकांनी इराणचं समर्थ केलं होतं, तिसऱ्या आठवड्यात 38 टक्के लोकांनी इराणचं समर्थन केलं आहे. तर चौथ्या आठवड्यात 58 टक्के भारतीय लोक इराणच्या बाजूने असल्याचं दिसून आलं आहे.
भारतानं कोणाची बाजू घ्यावी?
तर 60 टक्के लोकांना असं वाटत आहे की, भारतानं या युद्धात तटस्थ राहिलं पाहिजे, समजा जर भारताला कोणत्याही एका देशाची बाजू घ्यावीच लागली तर भारतानं इराणची बाजू घ्यावी असं भारतीय लोकांचं मत आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात 56 टक्के, तिसऱ्या आठवड्यात 62 टक्के तर चौथ्या आठवड्यात तब्बल 74 टक्के लोकांनी भारतानं इराणला समर्थन द्यावं असं म्हटलं आहे. मात्र या उलट परिस्थिती अमेरिकेची आहे. दुसऱ्या आठवड्यात 44 टक्के लोकांनी, तिसऱ्या आठवड्यात 38 टक्के लोकांनी तर चौथ्या आठवड्यात केवळ 26 टक्के लोकांनीच भारतानं अमेरिकेची बाजू घ्यावी असं म्हटलं आहे. यावरून लोकांचा इराणसंदर्भातील दृष्टीकोन बदलत असल्याचं दिसून येत आहे.
