तारिक रहमान पंतप्रधान होताच बांगलादेश सरकारची आणखी एक मोठी घोषणा, भारताला होणार मोठा फायदा, आता थेट…
बांगलादेशमध्ये तारिक रहमान यांचं सरकार येताच भारतासंदर्भात काही मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. शुक्रवारी व्हिसा सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानंतर आता आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.

बांगलादेशमध्ये बीएनपीचं सरकार स्थापन झालं आहे, तारिक रहमान यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेताच आता भारत आणि बांगलादेशमधील संबंध पुन्हा एकदा पूर्ववत होताना दिसत आहेत. शुक्रवारी बांगलादेशकडून व्हिसावरील निर्बंध उठवण्यात आले, भारतासाठी पुन्हा एकदा व्हिसा सुरू करण्याची घोषणा तेथील सरकारने केली होती. त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे भारत आणि बांगलादेशमधील मैत्री बस सेवा 24 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे. ही बस ढाका मार्गे भारतामधील अगरताळा आणि कोलकाता या दोन शहरांना जोडते. ही बस सेवा पुन्हा एकदा सुरू होणार असल्यानं दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बांगलादेशमध्ये तारिक रहमान यांचं सरकार येताच या बस सेवेची घोषणा करण्यात आली आहे.
बांगलादेशमध्ये उठाव
मैत्री बस सेवेमुळे अगरताळामधील लोकांना पुन्हा एकदा रोड मार्गे कोलकाताला जाता येणार आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये मोठा उठाव झाला होता, शेख हसीना यांना त्यामुळे बांगलादेशच्या पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं.तेव्हापासून ही बस सेवा बंद होती. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूसचं काळजीवाहू सरकार आलं, याकाळात भारत आणि बांगलादेशमधील संबंध चांगलेच ताणले गेले होते, मात्र त्यानंतर आता बांगलादेशमध्ये तारिक रहमान यांचं सरकार येताच बांगलादेश भारत संबंध सुधारत असल्याचं दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आता पुन्हा एकदा मैत्री बस सेवा सुरू होणार आहे.
भारताचे पूर्वीपासूनच बांगलादेशसोबत चांगले संबंध आहेत, मात्र शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर मोहम्म युनूस सरकारच्या काळात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक गोष्टी बंद करण्यात आल्या होत्या, त्यामध्ये दोन्ही देशांनी व्हिसा सेवा बंद केली होती, तसेच ही बस सेवा देखील बंद करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा नव्याने ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
