मला मरायचं नाही पण बायकोने…भाजपा नेत्याने पिलं विष, सासऱ्याच्या घरापुढेच मृत्यूचा भयंकर खेळ!
BJP Leader Died : नरेला येथील भाजप मंडळ अध्यक्ष आणि बँक फील्ड मॅनेजर विनोद मिश्रा यांनी 1 मे रोजी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये सासुरवाडीत घराच्या गेटसमोर विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

सासरच्या त्रासाला कंटाळून भाजप नेत्याने आयुष्य संपवलं असल्याचे समोर आले आहे. दिल्लीच्या नरेला येथील भाजप मंडळ अध्यक्ष आणि बँक फील्ड मॅनेजर विनोद मिश्रा यांनी 1 मे रोजी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये सासुरवाडीत घराच्या गेटसमोर विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. विष पिल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी विनोद यांनी एक ऑडिओ व्हायरल केला होता, ज्यामध्ये त्यांनी पत्नी अनिता उर्फ आरती, सासू आणि सासरच्या मंडळींवर छळ केल्याचा आरोप केला होता. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मृत्यूपूर्वी शेअर केला ऑडिओ
विनोद मिश्रा यांनी विष प्राशन करण्यापूर्वी 6-7 मिनिटांचा एक ऑडिओ रेकॉर्ड केला होता. या ऑडिओमध्ये त्यांनी रडत रडत म्हटले की, मला मरायचे नाही, पण पत्नी आणि सासरच्या लोकांनी मला इतका त्रास दिला आहे की आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग उरला नाही.’ मिश्रा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणीही केली होती. सासरकडील मंडळी त्यांच्या पत्नीला परत पाठवत नव्हती, त्यामुळे त्रस्त होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
मुलाचे आईवर आरोप
विनोद यांचा मुलगा कार्तिकने बर्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपल्या आई आणि तिच्या घरच्या लोकांना वडिलांच्या मृत्यूस जबाबदार धरले आहे. कार्तिकने आरोप केला की, त्याची आई वारंवार दिल्लीहून घरातील पैसे आणि दागिने घेऊन कानपूरला माहेरी जात असे. 2 एप्रिल रोजीही ती माहेरी गेली होती. वडील त्यांना परत आणण्यासाठी कानपूरला गेले होते, पण आईने येण्यास नकार दिला आणि सासरकडील मंडळींनी त्यांचा अपमान केला. याच अपमानामुळे त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली.
अंतिम संस्काराला पत्नी अनुपस्थित
विनोद यांच्या मृत्यूनंतर 2 तारखेला कन्नौज येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, मात्र यावेळी त्यांची पत्नी आणि तिच्या माहेरील कोणीही हजर नव्हते. विनोद यांचे भाऊ राजेश मिश्रा यांनी म्हटले की, त्यांच्या भावाने सासरच्या घरातच विष प्राशन केले, कारण त्यांना तिथे खूप त्रास दिला जात होता. दरम्यान, कुटुंबीयांनी आता पोलिसांकडे आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
