मोठी बातमी ! मुंबईत बसून दिल्ली हादरवण्याचा भयंकर कट, स्पेशल सेलने मुसक्या आवळताच हादरवणारी माहिती समोर
नोव्हेंबरमधील लाल किल्ल्याजवळच्या स्फोटानंतर दिल्ली पुन्हा टार्गेट होणार होती. टॉय कारच्या माध्यमातून घातपात घडवण्याचा कट रचण्यात आला होता. महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेलने संयुक्त कारवाई करत कुर्ला येथून 18 वर्षीय हमास सिद्दीकीला अटक केली. यामुळे राजधानीतील मोठा धोका टळला असून, दहशतवाद्यांचे कट उधळण्यात आले आहेत.

नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाचा धमाका अजूनही कित्येकांच्या मनात ताजा आहे, त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. मात्र आता राजधानी दिल्लीला पुन्हा टार्गेट करण्यात येणार होतं अशी माहिती समोर आली आहे. टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत घातपात घडवण्याचा कट उधळण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईतील कुर्ला येथून 18 वर्षांच्या हमास सिद्दीकीला अटक करण्यात आली आहे. दिल्ली स्पेशल सेल आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई करत हमास याला बेड्या ठोकल्या.
दिल्ली स्पेशल सेलकडून हमास सिद्दीकीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अटक केलेल्या हमासच्या वडिलांचं म्हणणं काय ?
दरम्यान टीव्ही9 मराठीने, अटक करण्यात आलेला हमास सिद्दीकी याच्या वडिलांशी जलालुद्दीन सिद्दीक्की यांच्यांशी संवाद साधला. 3 तारखेला काही अधिकाऱ्यांनी घरात येऊन हमासला अटक केली आणि ते घेऊन गेले. त्या दिवशी नेमकं काय घडलं, अधिकाऱ्यांनी हमासला अटक करून घेऊन जाताना काय सांगितलं, हे जलालुद्दीन यांनी सविस्तरपण सांगितलं.
पहाटे 4.30 -5 च्या सुमारास 18-20 लोकं इथे, आमच्या घरी आलो होते, त्यांनी माझ्या मुलाला उचललं आणि घेऊन गेले. माझा मुलगा नुकताच 18 वर्षांचा झालाय, तो एक विद्यार्थी आहे, एखादा गुन्हेगार नव्हे, तो चांगला, अभ्यासू मुलगा आहे. 10 वीत त्याला 76 टक्के मिळाले होते, असं हमासच्या वडिलांनी जलालुद्दीन यांनी सांगितलं.
मात्र गेल्या 2-3 महिन्यांतच त्याचं गेम खेळताना कोणाशी तरी कनेक्शन झालं, कारण संपूर्ण जगभरात पबजी वगैरे सारखे गेम खेळतात ना, त्यातूनच कनेक्शन झालं, असं समोरच्यांनी (अधिकारी) सांगितलं, असं ते म्हणाले.
अचानक वाढले त्याचे फोन कॉल्स
तो (हमास) काही लोकांच्या संपर्कात होता आणि दिल्लीत काहीतरी करण्याचा कट ते रचत होते, त्यात हमास सहभागी होता, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. गेल्या काही महिन्यात गेम खेलताना वगैरे मुलाकडून अशी एखादी ॲक्टिव्हिटी होत्ये, असं तुम्हाला वाटलं का, निदर्शनास आलं का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला.
पण जलालुद्दीन यांनी असं काही घडल्याचा दावा फेटाळून लावला. ‘ असं काहीच घडलं नव्हतं, फक्त त्याचे फोन कॉल्स खूप वाढले होते. ते पाहून त्याच्या आईने ही गोष्ट माझ्या निदर्शनास आणून दिली की बघा, आपला मुलगा किती जास्त वेळ फोनवर बोलतोय असं. तो बाहेर जाऊनही बराच बोलायचा. ते पाहून आम्ही त्याला खडसावलं, एवढं कोणाशी बोलत असतोस, असंही विचारलं. फोनवर जास्त बोलायचं नाहीये, तुझ्या अभ्यासवर लक्ष दे,’ असं मी त्याला सांगितलं. त्यावर त्यानेही होकार दिला. मात्र त्याच्या इतर अशा काहीच संशयास्पद ॲक्टिव्हिटी नव्हत्या. या सर्व अफवा फक्त एजन्सीकडून पसरवल्या जात आहेत, तो असा नाहीये, असं म्हणत त्याच्या वडिलांनी सर्व गोष्टी फेटाळून लावल्या.
