शुक्रवारी रात्रीच… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्या मागच्या घडामोडी आल्या समोर; पडद्यामागे…
Dharmendra Pradhan Resignation : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू होते, आज त्यांनी राजीनामा दिला आहे. अशातच आता या त्यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेतले आहे. आंदोलनादरम्यान CJPसोबत झालेल्या पहिल्या बैठकीत सरकारच्या वतीने चर्चा करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना सांगण्यात आले होते की, CJP चे नेते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे राजीनामा घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबतची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला आणि सरकारला देण्यात आली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असे वाटत होते की, विद्यार्थी आंदोलनाचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेवरही होत आहे. 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार तरुणांच्या चिंतेबाबत असंवेदनशील आहे, असा संदेश कोणत्याही परिस्थितीत जाऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. याच रणनीतीअंतर्गत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समोर आले आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा निर्णय शुक्रवारी रात्री?
धर्मेंद्र प्रधान यांना शुक्रवारी रात्री उशिराच पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, असे संकेत देण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी सुमारे 9 वाजता त्यांनी आपला राजीनामा पाठवला होता. राजीनाम्याची माहिती समोर येण्यापूर्वी धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बैठक झाली होती.
राजीनाम्याद्वारे सरकारचा तरुणांना संदेश
2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय पातळीवर, विशेषतः तरुणांमध्ये, कोणत्याही मोठ्या विरोधी आंदोलनाची परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी भूमिका घेत आहेत. सरकार तरुणांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे, असा संदेश देण्याची रणनीती सरकारकडून आखली जात आहे. दिल्लीबाहेरही या आंदोलनाचा विस्तार होत असल्याने पंतप्रधान चिंतेत होते. त्यामुळेच प्रधान यांच्या राजीनामा घेण्यात आला आहे.
CJP ने आंदोलन घेतले मागे
CJP आणि केंद्रीय मंत्र्यांमधील बैठकीत सरकारने आंदोलनाच्या तीन प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीने हे आंदोलन स्थगित कण्याची घोषणा केली आहे. मात्र सीजेपीकडून हा पहिला राजीनामा आहे, आगामी काळात इतरही मुद्द्यांवर आंदोलन केले जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
