अलविदा हरीश राणा..मुलगा गेल्यानंतर वडिलांचा अखेरचा मेसेज, वाचताच डोळ्यात तरळतील अश्रू !
13 वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणा यांच्यावर आज दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी दिल्यानंतर एम्समध्ये काल त्यांचे निधन झालं. अंत्यविधीच्या वेळी अत्यंत भावूक वातावरण होतं. कुटुंबीय, नातेवाईक आणि स्थानिक रहिवाशांनी त्यांना श्रद्धांजली वाहत अखेरचा निरोप दिला. मात्र त्यापूर्वी त्यांच्या वडिलांनी पाठवलेल्या संदेशाने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

एकेकाळी डोळ्यांत असंख्य स्वप्न घेऊन इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यास निघालेल्या हरीश राणा यांनी काल अखेरचा श्वास घेतला. तब्बल 13 वर्ष कोमात असलेल्या हरीश राणांनी काल जगाचा निरोप घेतला. आज सकाळी शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हरीश यांच्या जाण्याची बातमी, त्यांचे वडील, अशोक राणा यांनी सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर देताच, लोकांच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. अशोक राणींनी फक्त 1 मेसेज लिहीला होता – सकाळी 9 वाडता (हरीश राणाच्या) पार्थिवावर अंत्यसंस्कार, ग्रीन पार्क, दक्षिण दिल्ली येथे होतील.. ॐ शांति ॐ… असं त्यात नमूद करण्यात आलं होतं.
13 वर्षांच्या शांततेची अखेर
2013 साली हरीश राणा हे वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून पडले आणि कोमात गेले. तेव्हापासू ते लाईफ सपोर्टवर होते. पंजाब विद्यापीठात बी.टेकचा विद्यार्थी असलेले हरीश राणा चौथ्या मजल्यावरून धाडकन खाली पडले होते त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उर्वरित संपूर्ण आयुष्य रुग्णालयातील मशीनवरच अवलंबून होतं. वेळ पुढे सरकत होती, पण त्यांना कधीच शुद्ध आली नाही. कुटुंबासाठी ही प्रतीक्षा अंतहीन यातनेत बदलली.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय
अखेर गेल्या आठवड्यात, 11 मार्च 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून एका ऐतिहासिक निर्णयात, हरीश राणा यांना निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी देण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक वर्षे आशा बाळगून शक्य ते सर्व उपचार केले, पण कोणतीही सुधारणा दिसली नाही, तेव्हा त्यांनी हा कठीण मार्ग निवडला. न्यायालयाने हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने ऐकून घेतलं आणि वैद्यकीय नियमांनुसार या प्रक्रियेला परवानगी दिली. 14 मार्च रोजी हरीश राणा यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. तिथे, पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यासोबत होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, डॉक्टरांनी हळूहळू जीवनरक्षक प्रणाली काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली. हे अचानक उचललेलं पाऊल नव्हतं, तर ते अत्यंत बारकाईने वैद्यकीय देखरेखीखाली टप्प्याटप्प्याने पार पाडण्यात आले. या काळात हरीश यांना कोणत्याही प्रकारची वेदना किंवा अस्वस्थता जाणवणार नाही याची काळजी घेण्यात आली. त्यांच्या अखेरच्या क्षणी शांती मिळावी यासाठी त्यांना सतत वेदनाशामक औषधं दिली जात होती.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी डॉ. सीमा मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष वैद्यकीय पथक तयार करण्यात आलं होते. या पथकामध्ये न्यूरोसर्जरी, पॅलिएटिव्ह मेडिसिन, ऑन्को-ॲनेस्थेशिया आणि मानसोपचार या क्षेत्रांतील तज्ञांचा समावेश होता. पॅसिव्ह युथॅनेशिया दरम्यान, रुग्णाला वेदना होणार नाहीत याची खात्री करून, त्याचे पोषण हळूहळू कमी केले जातं असं ऑन्को-ॲनेस्थेशियाच्या माजी प्रमुख, डॉ. सुषमा भटनागर यांनी स्पष्ट केलं. ही केवळ एक वैद्यकीय प्रक्रिया नव्हती, तर सन्मानाने जीवन संपवण्याचा एक प्रयत्न होता.
त्या व्हिडीओने सर्व झाले भावूक
हरीश यांना एम्सला नेण्यापूर्वी गाझियाबादमधील घरातून एक व्हिडिओ समोर आला, ते पाहून अनेकांचं मन हेलावलं. त्या व्हिडिओमध्ये, ब्रह्मा कुमारी संघटनेची एक महिला सदस्य हरीश यांच्या कपाळावर टिळा लावला “सर्वांना माफ कर आणि क्षमा माग… आता शांतपणे विश्रांती घे.”असंही त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
सोसायनटीमध्ये सन्नाटा
हरीश राणा यांचं कुटुंब बऱ्याच काळापासून गाझियाबादमधील राजनगर एक्सटेंशन येथील राज एम्पायर सोसायटीमध्ये राहत होतं. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. या 13 वर्षांतील कुटुंबाचे अनुभव शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे अं अनेकांनी सांगितसं. हरीश यांचा भाऊ, आशिष, त्यांची काळजी घेत होता. .या कठीण काळात संपूर्ण सोसायटी कुटुंबाच्या पाठीशी उभी आहे, असं एकांनी नमूद केलं.
वडिलांचा मेसेज पाहून लोकांच्या डोळ्यात अश्रू
हरीश राणा यांच्या निधनानंतर, त्यांचे वडील अशोक राणा यांच्या अगदी लहानशा संदेशाने अनेकांची मने हेलावली. सोशल मीडियावर शोकसंदेशांचा वर्षाव झाला. एम्स रुग्णालयानेही हरीश राणा यांच्या निधनाची पुष्टी करत निवेदन जारी कें होतं. त्यानुसार, 24 मार्च2026 रोजी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी हरीश राणा यांचं निधन झाले. ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली होते आणि संपूर्ण प्रक्रिया वैद्यकीय नियमांनुसार पार पाडण्यात आली, असं नमूद करण्यात आलं.
