ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह धो-धो बरसणार, या राज्यांना तुफानी पावसाचा अलर्ट जारी
IMD Rain Alert : उत्तर आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये या संपूर्ण आठवड्यात भीषण उकाडा सहन करावा लागणार आहे, मात्र देशाच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्याच्या विविध भागात सूर्य आग ओकत आहे, त्यामुळे हवामान विभागाने उत्तर भारतासह देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. कारण उत्तर आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये या संपूर्ण आठवड्यात भीषण उकाडा आणि उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहणार आहे. मात्र ईशान्य भारत, अंदमान आणि नकोबार बेटे आणि काही किनारी भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आसाम मेघालय आणि अरूणाचल प्रदेशमध्ये 21 मेपर्यंत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 22 ते 25 मेदरम्यान या भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खासकरून 23 आणि 24 मे रोजी या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अंडमान-निकोबार, बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 19 ते 25 मेदरम्यान वादळी वारे, विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणातही पावसाची शक्यता
पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये 19 ते 23 मेदरम्यान धुळीचे वादळ आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळ, माहे आणि लक्षद्वीप मध्ये 19 ते 25 मेदरम्यान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागातही या काळात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातीस मधील कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 19 आणि 20 मे रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे.
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील डोंगराळ भागात 19 ते 23 मेदरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काही भागांत जोरदार वाऱ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर दिल्ली, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश आणि आसपासच्या मैदानी भागांमध्ये धुळीचे वारे आणि उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
या भागात उष्णतेची लाट
हवामान विभागाने अलर्ट जारी करत म्हटले की, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, विदर्भ, छत्तीसगड, तेलंगणा आणि ओडिशामध्ये या आठवड्यात तीव्र उष्णतेची लाट जाणवणार आहे. मात्र महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 19 मेनंतर तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची शक्यता आहे, यामुळे नागरिकांना काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
