‘कॉकरोच जनता पार्टी’च्या दिल्लीमधील आंदोलनावर हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
भाजपच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिल्लीमधील CJP च्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाल्या हेमा मालिनी?

‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने सोमवारी नवी दिल्लीत मोठे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि युवक सहभागी झाले. आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धक्काबुक्की तसेच झटापट झाल्याची माहिती समोर आली असून, यामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जखमी झाले असल्याची बातमी समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आंदोलनाचा मार्ग योग्य नसल्याचे सांगत, कोणतीही समस्या संवाद आणि चर्चेतून सोडवावी असे मत व्यक्त केले.
‘आंदोलनाऐवजी चर्चेला प्राधान्य द्या’
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या, ‘जर काही समस्या असेल तर ती योग्य पद्धतीने चर्चेतून मांडली पाहिजे. अशा प्रकारे रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याने कोणताही प्रश्न सुटणार नाही. देशातील युवक आणि शिक्षण व्यवस्थेसाठी मोदी सरकारने सातत्याने काम केले आहे. त्यामुळे अशा आंदोलनाला काही अर्थ नाही.’
त्या पुढे म्हणाल्या, ‘प्रश्नांचे समाधान संवादातूनच होऊ शकते. विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी करून घेताना त्यांची दिशाभूल होता कामा नये. त्यांना नेमकी समस्या काय आहे हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.’
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत मौन
हेमा मालिनी यांना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र, या मुद्द्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
सीजेपीची प्रमुख मागणी काय?
सीजेपीकडून नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी सातत्याने मागणी केली जात आहे. या मागण्यांसाठी पक्षाने 20 जुलै रोजी ‘संसद मार्च’चे आवाहन केले होते.
या आंदोलनासाठी दिल्लीसह देशभरातील विविध राज्यांतून मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि युवक राजधानीत दाखल झाले. आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर केला.
