
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. भारतावरही या युद्धाचा परिणाम झाला आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेल आणि गॅसच्या मुद्द्यावर लोकसभेत निवेदन दिले. यावेळी त्यांनी देशातील जनतेचे हित सुरक्षित राहील, असा विश्वास दिला आणि सरकार सर्व आवश्यक प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच या युद्धाचा परिणाम दीर्घकाळ राहू शकतो, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आणि संयमाने परिस्थितीचा सामना करण्याची गरज असल्याचेही म्हटले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण कोरोना काळात तयारीत होतो आणि त्याचा फायदा झाला. त्याचप्रमाणे आता देखील धैर्य आणि संयम ठेवून प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची गरज आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल, गॅस आणि खत होर्मुज सामुद्रधुनीमार्गे येतात. युद्धानंतर जहाजांची वाहतूक आव्हानात्मक झाली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरवठा फारसा बाधित होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भारत आपल्या गरजेच्या सुमारे 60 टक्के एलपीजी आयात करतो. पुरवठ्यात अडचण निर्माण झाल्याने सरकारने घरगुती वापराला प्राधान्य दिले असून देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठीही उपाय योजना केल्या जात आहेत.
भारतातील तेलसाठ्याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, गेल्या दशकात ऊर्जा सुरक्षिततेसाठी घेतलेली पावले आता अधिक महत्त्वाची ठरत आहेत. भारताने ऊर्जा आयात विविध देशांमधून करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी 27 देशांमधून होणारी आयात आता 41 देशांपर्यंत वाढवली आहे. भारताकडे सध्या 53 लाख मेट्रिक टन तेलसाठा आहे आणि तो 65 लाखांपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच कंपन्यांकडेही वेगळे साठे आहेत. आम्ही विविध देशांशी संपर्कात असून पुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. खाडी आणि आसपासच्या समुद्री मार्गांवर सरकारचे बारकाईने लक्ष आहे. जहाजांच्या सुरक्षेसाठी आम्ही तत्पर आहोत.
पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, ‘युद्ध सुरू झाल्यापासून या भागातील भारतीयांना मदत करण्याचे काम सुरु आहे. मी संबंदित देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी बोललेलो आहे. काही लोक जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आम्ही शक्य ती मदत देत आहोत. भारतीयांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. युद्धाच्या काळात 3 लाख 75 हजार भारतीय मायदेशी परतले आहे. तसेच इराणमधून 1000 लोक मायदेशी परतले आहेत. सरकार संवेदनशील आणि सतर्क आहे.’