Supriya Sule : देशाची अर्थव्यवस्था कोलमडण्याची भीती… पिक्चर अभी बाकी है… सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा
आम्हाला आश्चर्य वाटत नाही. हे अपेक्षितच होतं. आम्ही सातत्याने बोलत होतो. गेल्या आठवड्यात छगन भुजबळ आणि मुख्यमंत्र्यांची दोन वेगवेगळी स्टेटमेंट आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, इंधनाचा पुष्कळ साठा आहे. भुजबळ म्हणाले, इंधनाचा साठा फक्त 30 दिवसाचा आहे. कुणाचं खरं मानायचं? सरकार कधी खरं बोलणार आहे? असा सवाल शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

संपूर्ण देशात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक पेट्रोल पंपांवर तर पेट्रोल आणि डिझेल नसल्याचे बोर्ड लागले आहेत. त्यामुळे एकच हाहा:कार उडाला आहे. इंधन तुटवड्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आम्ही सहा महिन्यापूर्वीच सरकारला इशारा दिला होता. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढणार आहेत हे मी, राहुल गांधी आणि इतर विरोधक सांगत होतो. संसदेतील तुम्ही आमची भाषणं काढून पाहा. पण आमचं ऐकलं गेलं नाही. सरकारचं नियोजन नसल्याचं आम्ही पूर्वीच सांगितलं होतं, ते आता दिसत आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
ऑल पार्टी मिटिंग बोलवा. जगात क्रायसिस चाललंय. भारतात इकॉनॉमिक क्रायसिस होऊन आपली आर्थिक व्यवस्था कोलमडेल की काय अशी अवस्था आली आहे. त्या आधी थोडासा जबाबदारपणा दाखवून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली पाहिजे. याबाबत मी पंतप्रधानांना परदेशात जाण्यापूर्वी विनंती केली होती. पंतप्रधानांच्या नेतृत्वात ऑल पार्टी मिटिंग बोलवा. देशात प्रचंड संघर्ष आणि अडचणीचा काळ आहे. नियोजनबद्ध प्लानिंग न केल्याने इंधनाचे दर वाढत आहेत. आता फक्त 8 रुपयांचा पहिला टप्पा गाठलाय. पिक्चर अभी बाकी है, ट्रेलर आपण पाहिलाय, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
आता दसपट आर्थिक अडचण
हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भाजप भांडणं लावत आहे, असा सवाल करण्यात आला. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. भांडण लावून प्रश्न सुटणार नाही. पेट्रोल आणि महागाईचा प्रश्न सुटणार नाही. 2013 मध्ये सत्ताधाऱ्यांनी महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराविरोधात आमच्या विरुद्ध संघर्ष केला. तेव्हा आमच्यावर आर्थिक परिस्थिती भयानक असल्याचा आरोप करण्यात आला. त्याच्या पेक्षा दसपट आज भारत आणि महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आहे. हा माझा डेटा नाही. हा भारत सरकारचा डेटा सांगतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
केंद्रातील मंत्री बोलत नाही
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी भ्रष्टाचारी लोकच इंधन नसल्याचा दावा करत असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. वाशिम किंवा कोणत्या तरी जिल्ह्याचे कलेक्टर हे पेट्रोल पंपावर फिरत होते. या देशातील सामान्य माणूस भ्रष्टाचारी झाला? त्यांच्या पक्षातील लोक भ्रष्टाचारी नाही? या देशातील गरीब आणि कष्ट करणारा, काळ्या मातीशी इमान राखणारा प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी आहे? हा भारताचा अपमान आहे. महाराष्ट्रातील मंत्री असं बोलतात. केंद्रातील मंत्री असं बोलत नाहीत. त्यांना परिस्थितीची जाणीव आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
पैशाचं सोंग घेता येत नाही
12 वर्ष या देशाने त्यांना निवडून दिलं. त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. पण 12 वर्षानंतर देशाची आर्थिक परिस्थिती काय आहे? याचं चिंतन त्यांनी केलं पाहिजे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या देशात वाढला आहे. शेतकरी अडचणीत आहे. कांदा उत्पादन घेणारा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्यांच्या पदरात काही पडत नाही. हे प्रश्न सुटणार कसे. कशाचंही सोंग घेता येतं पण अन्नधान्य आणि पैशाचं सोंग घेता येत नाही, असंही त्या म्हणाल्या.
