बोम्मईंनी पुन्हा तिच री ओढली, महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही…
लोकशाही देशात केंद्र सरकार दोन राज्यातील वाद सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्याना बोलावू शकते आणि त्यासंदर्भात सल्लाही देऊ शकते असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यामुळे अमित शाह यांनीही तेच केल्याचे सांगितले.
बेळगावः सीमावादावरून महाराष्ट्रातही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान चालू असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. सीमावाद हे प्रकरण न्यायालयीन कक्षेत असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हा प्रश्न निकाली निघाली असून एक इंचही जमीन दिली जाणार नाही असं वक्तव्य त्यांनी कर्नाटक विधानसभेत केले आहे. त्यामुळे बेळगावसह सीमाभागात याविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
कर्नाटक विधानसभेत आज शून्य प्रहरावेळी सीमाप्रश्नावर आज प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी केवळ दोन्ही राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या होत्या असंही त्यांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर सीमाप्रश्नी महाजन अहवाल अंतिम असल्याच्या कर्नाटकाच्या भूमिकेबाबत उद्या दोन्ही सभागृहात ठराव करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचा हा निर्मय महाराष्ट्राच्या भावना दुखवणारा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
लोकशाही देशात केंद्र सरकार दोन राज्यातील वाद सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्याना बोलावू शकते आणि त्यासंदर्भात सल्लाही देऊ शकते असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यामुळे अमित शाह यांनीही तेच केल्याचे सांगितले.
यावेळी सभागृहात बोलताना त्यांनी सांगितले की, सीमाप्रश्नी आमची भूमिका स्पष्ट आहे. कर्नाटकाची एक इंचही जमीन आम्ही महाराष्ट्राला देणार नाही असं त्यांनी आज स्पष्टपणे सांगितले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. हा वाद मिठवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांना बोलावून चर्चा करूनही बोम्मई हे जर अशी भाषा करत असतील तर सीमावाद सुटण्याऐवजी तो आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.