Tv9 Polstrat Opinion Poll LIVE : देशातील सर्वात मोठा ओपिनियन पोल, महाराष्ट्रासह बंगाल, पंजाब, राजस्थानात काय घडणार?

| Updated on: Apr 16, 2024 | 6:51 PM

Tv9, Peoples Insight, Polstrat च्या सर्व्हेत सुमारे 25 लाख लोकांचं सँपल घेण्यात आलं आहे. देशातील विश्वासहार्य ओपिनियन पोलच्या या सर्व्हेत रँडम नंबर जनरेटरच्याद्वारे कॉल करण्यात आले आहेत. यात लोकसभेच्या 543 जागांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व्हेतून अत्यंत धक्कादायक निकाल येण्याची शक्यता आहे.

Tv9 Polstrat Opinion Poll LIVE : देशातील सर्वात मोठा ओपिनियन पोल, महाराष्ट्रासह बंगाल, पंजाब, राजस्थानात काय घडणार?
Poll Survey projection
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मतदानापूर्वीच Tv9चा देशातील सर्वात मोठा ओपिनियन पोल आला आहे. या ओपिनियन पोलमध्ये देशातील 543 जागांचा सर्व्हे करण्यात आला आहे. Tv9, Peoples Insight, Polstratच्या या सर्व्हेत एकूण 25 लाख लोकांचे सँपल घेण्यात आले आहेत. या ओपिनियन पोलसाठी COMPUTER ASSISTED TELEPHONE INTERVIEWINGच्या माध्यमातून लोकांची मते जाणून घेण्यात आली आहे. या ओपिनियन पोलमधून देशाचा मूड दिसून येणार आहेत.

टीव्ही9 चा ओपिनयन पोल हा देशातील सर्वात विश्वासहार्य ओपिनियन पोल आहे. या सर्व्हेत रँडम नंबर जनरेटरच्यामाध्यमातून कॉल करण्यात आले. यात लोकसभेच्या 543 जागांचा समावेश आहे. या सर्व्हेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचा सर्व्हे सँपल घेण्यात आला आहे. 1 एप्रिल पासून 13 एप्रिलपर्यंत हे काम करण्यात आलं. यात देशातील 4123 विधानसभा मतदारसंघांचे सँपल घेण्यात आले आहे.

हरियाणा भाजप, पण काँग्रेसचं खातं उघडणार

हरियाणातील 10 जागांपैकी भाजपला 9 जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेससाठी एक आनंदाची बातमी आहे. ते म्हणजे काँग्रेसचं खातं उघडणार असून काँग्रेसला एका जागेवर विजय मिळताना दिसत आहे. रोहतक मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळताना दिसत आहे. मतांच्या टक्केवारीत एनडीए आघाडीवर दिसत आहे. एनडीएला 52.25 टक्के तर इंडिया आघाडीला 35.01 टक्के मते मिळताना दिसत आहेत.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची बल्लेबल्ले

महाराष्ट्रातील 48 जगांपैकी भाजप 25 जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. तर काँग्रेसला पाच जागा मिळताना दिसत आहेत. शिंदे गटाला फक्त 3 जागा मिळतील. तर उद्धव ठाकरे गटाला 10 जागा मिळताना दिसत आहे. शरद पवार गटाला 5 जागांवर विजय मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाला एकही जागा मिळताना दिसत नाहीये. मतांच्या टक्केवारीकडे नजर टाकल्यास महाराष्ट्रात एनडीएला 40.22 टक्के तर इंडिया आघाडीला 40.97 टक्के मते मिळताना दिसत आहेत. म्हणजेच इंडिया आघाडीला सर्वाधिक मते मिळताना दिसत आहे.

मुख्य जागांचा विचार केल्यास संभाजी नगरची जागा महायुतीकडे जाताना दिसत आहे. धुळ्याची सीट भाजप जिंकू शकतो. तर लातूरमध्ये काँग्रेसचा विजय होण्याची शक्यता आहे. मुंबई उत्तरमधून पीयूष गोयल विजयी होऊ शकतात. तर मावळची जागा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नागपुरातून नितीन गडकरी आणि बारामतीतून सुप्रिया सुळे जिंकण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

असाम- ओडिशात भाजपला फायदा

असामच्या 14 जागांपैकी भाजपला 11 जागा मिळताना दिसत आहे. तर काँग्रेसला एक जागा मिळताना दिसत आहे. सर्व्हेत एजीपीला एक आणि इतरांना एक जागा मिळताना दिसत आहे. तर एनडीएला 54.95 टक्के मते मिळताना दिसत असून इंडिया आघाडीला 20.26 टक्के मते मिळताना दिसत आहेत. ओडिशात 21 जागांपैकी भाजपच्या खात्यात 14 जागा येण्याची शक्यता आहे. काँग्रेसला एक तर बीजेडीला सहा जागा मिळताना दिसत आहेत. तसेच एनडीएला 40.22 टक्के तर इंडिया आघाडीला 11.76 टक्के मते मिळताना दिसत आहेत. बीजेडीला 32.64 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

झारखंड आणि छत्तीगडमध्ये काँग्रेस संपणार

झारखंडच्या 14 जागांपैकी भाजपला 12 जागा मिळताना दिसत आहे. तर इंडिया आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागणार आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या वाट्याला एकही जागा येताना दिसत नाहीये. छत्तीसगडमध्ये 11 जागांपैकी सर्वच जागांवर भाजपचा विजय होताना दिसत आहे. या ठिकाणी एनडीएला 58.06 टक्के मते मिळताना दिसत आहेत. तर इंडिया आघाडीला 28.79 टक्के मते मिळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल या निवडणुकीत पराभूत होताना दिसत आहेत.

पंजाबमध्ये आप

पंजाबमधील 13 जागांपैकी आपला 8 जागांवर विजय मिळताना दिसत आहे. भाजपलाही फायदा होताना दिसत आहे. भाजपला चार जागांवर विजय मिळताना दिसत आहे. तर काँग्रेसला राज्यात एकही जागा मिळताना दिसत नाहीये. शिरोमणी अकाली दलाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जालंधरमध्ये भाजप विजयी होताना दिसत आहे. या ठिकाणी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना उमेदवारी दिली आहे.

राजस्थानात पाच जागांवर नुकसान

राजस्थानातील 25 जागांपैकी 19 जागांवर भाजप विजयी होताना दिसत आहे. काँग्रेसला दोन तर आरएलटीपीला एक जागा मिळताना दिसत आहे. सीपीआय आणि बसपाला प्रत्येकी एक जागा मिळताना दिसत आहे. तसेच इतरांना एक जागा मिळताना दिसत आहे. राजस्थानात भाजपला मागच्यावेळी 24 जागा मिळाल्या होत्या. यावेळी बीजेपीचं पाच जागांवर नुकसान होताना दिसत आहे. सर्व्हेनुसार एनडीएला 48.59 टक्के मते मिळताना दिसत आहेत. इंडिया आघाडीला 39.19 टक्के मते मिळताना दिसत आहेत. या निवडणुकीत अशोक गेहलोत यांचे चिरंजीव पराभूत होताना दिसत आहेत.

गुजरात-मध्यप्रदेशात सुपडा साफ

मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये विरोधकांचा सुपडा साफ होताना दिसत आहे. मध्यप्रदेशात भाजप सर्वच्या सर्व 29 जागा जिंकताना दिसत आहेत. या ठिकाणी विरोधकांना कोणतीच संधी मिळताना दिसत नाहीये. हीच परिस्थिती गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये भाजप सर्वच्या सर्व 26 जागांवर विजयी होताना दिसत आहे.

बिहारमध्ये काय होणार?

बिहारच्या 40 जागांपैकी एनडीएला 31 जागा मिळण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीला 8 जागा मिळतील असं सर्व्हे सांगतो. एक सीट इतरांना मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे बिहारच्या पूर्णिया मतदारसंघाची सीट अपक्षाच्या वाट्याला जाणार असल्याचं दिसतंय. म्हणजेच या मतदारसंघातून पप्पू यादव विजयी होताना दिसत आहेत. तर लालू प्रसाद यादव यांच्या दोन्ही मुली पराभूत होताना दिसत आहेत. बिहारमध्ये एनडीएला 41.88 टक्के मते मिळताना दिसत आहेत.

बंगालमध्ये काय?

पश्चिम बंगालमधील 42 जागांचा निकाल धक्कादायक येण्याची शक्यता आहे. एनडीएला या निवडणुकीत 20 जागा मिळताना दिसत आहेत. तर टीएमसीला 21 जागा मिळताना दिसत आहे. तर इंडिया आघाडीला फक्त एक जागा मिळताना दिसत आहे.