Noida Twin Tower Demolition | देशाचं लक्ष दिल्लीकडे, 32 मजली ट्विन टॉवर्स 12 सेकंदात उध्वस्त होणार, काय आहे नेमकं कारण?
नोएडातील 32 मजली दोन इमारती पाडण्यासाठी दिल्ली प्रशासनातर्फे मोठी खबरदारी घेतली जात आहे. इमारत पाडल्यानंतर जमिनीपासून सुमारे 300 मीटरपर्यंत धुळीचे लोट उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा, बचाव पथक तैनात करण्यात येणार आहेत.

नवी दिल्लीः देशाची राजधानी नवी दिल्लीजवळील नोएडा (Noida twin towers) परिसरात उद्या एक ऐतिहासिक घटना घडणार आहे. येथील 32 मजली ट्विन टॉवर्स काही क्षणात उध्वस्त (Building Demolition) केले जाणार आहेत. अगदी दाटीवाटीच्या वसाहतीत उभ्या असलेल्या या दिमाखदार इमारती पाडण्याचं मोठं आव्हान दिल्ली प्रशासनासमोर (Delhi Administration) आहे. कारण भर वसतीतील एवढ्या उंच इमारती पाडण्याची ही पहिलीच वेळ आहे. उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था आणि हायटेक तंत्रज्ञानाच्या मदतीने या जुळ्या इमारती पाडण्यात येणार आहे. इमारत कोसळण्याचा वेग एवढा भयंकर असणारे की त्यामुळे कितीही मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे आजूबाजूच्या परिरातील तब्बल ७ हजार नागरिकांना स्थलांतरीत होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
नोएडातील सेक्टर 93 मध्ये सुपरटेक बिल्डर्स या खासगी बांधकाम व्यवसायिकाने दोन 32 मजली इमारती बांधल्या आहेत. अॅपेक्स आणि सेयान असं या इमारतींचं नाव आहे. मात्र इमारती बांधताना भुखंडाच्या तसेच बांधकामाच्या नियमांना पायदळी तुडवण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळेच या इमारती पाडण्याचा आदेश काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यानुसार बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अत्युच्च तंत्रज्ञानाचा वापर करत या इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. एवढं मोठं बजेट वापरून आणि मेहनतीने बांधण्यात आलेल्या टोलेगंज इमारती पाडण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिल्लीतील अतिशय दाटीवाटीच्या वसतीत उभ्या या दोन इमारतींजवळच 12 मजली इमारत आहे. विशेष म्हणजे अॅपक्स आणि सेयान या दोघींमध्ये तर फक्त9 मीटर अंतर आहे. या इमारती जमीनदोस्त करण्याच्या प्रक्रियेसाठी येथील नागरिकांना पाच तास इतरत्र स्थलांतरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पाळीव प्राण्यांनाही या परिसरात ठेवू नये, असे सांगण्या आले आहे.
Delhi govt proposes to construct twin towers at ITO as its new office building
Read @ANI Story | https://t.co/pQUnebSSge#DelhiGovernment #Delhi pic.twitter.com/iMyWqDchUC
— ANI Digital (@ani_digital) January 5, 2022
पाडापाडीसाठी खबरदारीचे चोख उपाय
32 मजली दोन इमारती पाडण्यासाठी दिल्ली प्रशासनातर्फे मोठी खबरदारी घेतली जात आहे. इमारत पाडल्यानंतर जमिनीपासून सुमारे 300 मीटरपर्यंत धुळीचे लोट उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा, बचाव पथक तैनात करण्यात येणार आहेत. या ठिकाणापासून15 मीटरवर संपूर्ण दिल्लीला गॅस पुरवठा करणारी भूमिगत पाइपलाइन आहे. इमारत पाडताना हादरे बसतील, त्यामुळे परिसरातील इमारतींनाही अलर्ट करण्यात आलं आहे. मात्र सुरक्षेचे सर्व उपाय योजले असून नागरिकांनी काळजी करू नये, असं आवाहन या प्रक्रियेसाठी नेमलेल्या अभियंत्यांनी केलं आहे.
