Nitin Gadkari : नितीन गडकरी ॲक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय, दिल्ली मुंबई एक्सप्रे वेवर…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील सुरक्षा पाहणीसाठी राजस्थान दौऱ्यावर आहेत. अलीकडील भीषण अपघातानंतर, विशेषतः दिशादर्शक फलकांच्या त्रुटींमुळे वाढलेल्या मृत्यूदराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे. गडकरी सुरक्षा उपाययोजना आणि एक्सप्रेसवेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यात ते मुकुंदरा टनेल आणि रतलाम प्रकल्पांचीही पाहणी करतील, ज्यामुळे रस्ते सुरक्षेत सुधारणा अपेक्षित आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी बुधवारी राजस्थान दौऱ्यावर असून, ते दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. अलीकडेच दौसा परिसरात झालेल्या भीषण बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. नितीन गडकरी हे मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेवरून कारने प्रवास करत दिल्ली-वडोदरा एक्सप्रेसवेवरील सुरक्षाव्यवस्था आणि कामकाजाचा आढावा घेणार आहेत. 1 जुलै रोजी पहाटे हरिद्वारहून इंदूरकडे जाणारी बस एक्सप्रेसवेवर एका ट्रकवर आदळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला होता, तर 28 प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर या मार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांवर आणि दिशादर्शक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दोन वर्षांत 61 मृत्यू; सुरक्षेतील त्रुटींची चर्चा
दौसा जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर 2025 मध्ये 33 अपघात झाले असून त्यात 35 जणांचा मृत्यू झाला. तर 2026 मध्ये जूनअखेरपर्यंत एकूण 24 अपघातांत आत्तापर्यंत 26 लोकांनी जीव गमावला आहे. दोन वर्षांत 61 जणांचा मृत्यू झाल्याने या मार्गावरील सुरक्षाव्यवस्था खरच परिणामकारक आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, 1 जुलैला जेव्हा अपघात झाला, त्यावेळी पुढे असलेल्या ट्रकला जयपूर-अजमेर मार्गावर वळायचं होतं. मात्र, झिरो पॉइंटवर पुरेसे स्पष्ट दिशादर्शक फलक नसल्यामुळे चालक गोंधळला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. ट्रकचा वेग कमी झाल्यानंतर मागून येणारी बस त्यावर आदळली.
अस्पष्ट साइनबोर्डमुळे चालकांचा गोंधळ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूर 4C लिंक एक्सप्रेसवेवर वळताना झिरो पॉइंटवर स्पष्ट दिशादर्शक बाण किंवा माहितीफलक नसल्यामुळे दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचा अनेकदा निर्माण होतो. काही वाहने पुढे गेल्यानंतर अचानक वेग कमी करतात किंवा मागे वळण्याचाही प्रयत्न करतात. अशा प्रकारांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचं दिसून आलं आहे. टर्नच्या सुमारे दोन किलोमीटर आधी साइनबोर्ड लावण्यात आले असले तरी त्यावरील दिशादर्शक बाण लहान असल्याने भरधाव वेगात ते सहज लक्षात येत नाहीत. जयपूरकडे जाणाऱ्या विविध मार्गांबाबतही पुरेशी स्पष्ट माहिती फलकांवर उपलब्ध नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या अपघातानंतर राजस्थान सरकारने परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेण्यात आल्या असून, आयजी राहुल प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली अलवर ते दौसा दरम्यान एक्सप्रेसवेलगतची तात्पुरती अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. अतिक्रमणे हटवण्याची मोहीम पूर्ण करण्यात आली असून, 1 जुलैच्या अपघाताचे नेमके कारण चौकशी अहवालानंतरच स्पष्ट होईल असं आयजी राहुल प्रकाश यांनी सांगितलं.
दरम्यान, जिल्हाधिकारी सौम्या झा यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती 8 आणि 9 जुलै रोजी एक्सप्रेसवेच्या पॅकेज 6, 7 आणि 8 मधील 150 ते 240 किलोमीटरपर्यंतच्या भागाची पाहणी करणार आहे.
दरम्यान दौसा येथील पाहणीनंतर नितीन गडकरी कोटा जवळील मुकुंदरा टनल प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. तेथे ते बोगद्याच्या कामाचा तसेच एक्सप्रेसवेच्या प्रगतीचा आढावा घेतील. यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत समीक्षा बैठक होणार असून, पुढील टप्प्यात ते रतलाम येथील वे-साइड अमेनिटी प्रकल्पालाही भेट देणार आहेत.
