आधी आर्मीला ग्रीन सिग्नल, आता संपूर्ण जगाचे लक्ष मोदींच्या निवासस्थानाकडे, 3 प्रमुख नेत्यांची हायलेव्हल मिटिंग!!
Pahalgam Terror Attack : या बैठकात मोदी यांनी सैन्याला पाकिस्ताला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ आणि टार्गेट ठरवण्यास सूट दिल्याचं सांगितलं जात आहे. आता या निर्णयानंतर मोदी यांच्या निवासस्थानाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. येथे रोज अनेक महत्त्वाच्या बैठका होत आहेत. आजदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी अनेक बैठका पार पडल्या. या बैठकात मोदी यांनी सैन्याला पाकिस्ताला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ आणि टार्गेट ठरवण्यास सूट दिल्याचं सांगितलं जात आहे. आता या निर्णयानंतर मोदी यांच्या निवासस्थानाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे मोदी यांच्यासह भारतातील तीन प्रमुख नेत्यांत आणखी एक बैठक होत आहे.
नरेंद्र मोदी-अमित शाहा, राजनाथ सिंह यांच्यात बैठक
मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांच्यात एक बैठक होत आहे. मोदी यांनी काही वेळापूर्वी भारताच्या तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख, केंद्रीय संरक्षणंत्री तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासोबत एक बैठक घेतली. ही बैठक संपताच अमित शाह हे मोदींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. आता मोदी, शाहा आणि राजनाथ सिंह यांच्यात उच्चस्तरीय बैठक होत आहे. या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा होणार? तसेच बैठकीअंती काय ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मोहन भागवत मोदींच्या भेटीला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे मोदी आणि मोहन भागवत यांच्यातही आता वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान मोहन भागवत मोदींना भेटायला नेमकं का गेले? हे स्पष्टपणे समजू शकलेले नाही. मात्र याआधी मोदी यांनी सैन्यदलाच्या प्रमुखांसोबत बैठक घेतल्यानंतर मोहन भागवत यांच्या या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मोदी, सैन्यदल प्रमुखांच्या बैठकीत काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी आणि भारताच्या तिन्ही सैन्यदल प्रमुखांची एक बैठक पार पडली. या बैठकीत राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत मोदी यांनी तिन्ही सैन्यदलांवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलं आहे. तसेच पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायचं असेल तर सैन्याने टार्गेट ठरवावे आणि वेळ निश्चित करावी. या निर्णयात कोणीही हस्तक्षेप करणार नाही, असं मोदी यांनी सैन्याला सांगितलं आहे. त्यामुळे आता भारतीय सैन्य आगामीक काळात नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.