शस्त्रसंधीचं उल्लंघन म्हणजे….लष्कराला…पाकिस्तानच्या कुरापतींवर भारताने स्पष्ट केली भूमिका!
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. या निर्णयानंतर दोन्ही देशांतील तणाव निवळेल अशी आशा व्यक्त केली जात होती. असे असतानाच आता पाकिस्तानने या शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

India Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. या निर्णयानंतर दोन्ही देशांतील तणाव निवळेल अशी आशा व्यक्त केली जात होती. असे असतानाच आता पाकिस्तानने या शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सेनेने जम्मू, राजस्थान, पंजाब या सीमाभागातील राज्यांवर हवाई हल्ले केले आहेत. या सर्व घडामोडीनंतर आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केले आहेत. कोणत्याही अतिक्रमणाचा सामना करण्यासाठी ठोस आणि कठोर पाऊल उचलण्याचा आदेश देण्यात आला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले आहे.
अतिक्रमणाला रोखण्यासाठी लवकरात लवकर कारवाई करावी
भारतीय सेना प्रत्युत्तर देत आहे. सीमेवर होत असलेले हल्ले हे अतिक्रमण अत्यंत निंदनीय आहेत. यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे. पाकिस्तानने या स्थितीला व्यवस्थितपणे समजून घेतले पाहिजे आणि या अतिक्रमणाला रोखण्यासाठी लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे, अशी भूमिका मिस्त्री यांनी स्पष्ट केली.
शस्त्रसंधीचं उल्लंघन ही गंभीर बाब- मिस्त्री
शस्त्रसंधी झाल्यानंतरही सीमेपलीकडून गोळीबार सुरू आहे. अवघ्या काही तासातच शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. ही अतिशय निंदनीय आणि गंभीर गोष्ट आहे. पाकिस्तानने ही गोष्ट गंभीरपणे घ्यावी आणि योग्य ती कार्यवाही करून सीमेपलीकडून होणारा गोळीबार थांबवावा, असं मिस्त्री यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे.
ठोस आणि कठोर निर्णय घेण्याचा आदेश दिला
तसेच भारतीय लष्कराचे या सर्व परिस्थितीवर पूर्ण लक्ष आहे. कोणत्याही अतिक्रमणाचा सामना करण्यासाठी ठोस आणि कठोर निर्णय घेण्याचा आदेश देण्यात आलेला आहे, असेही मिस्त्री यांनी सांगितले आहे.
भारतीय लष्कर योग्य ते प्रत्युत्तर देत आहे- मिस्त्री
शस्त्रसंधी झाल्यानंतर गेल्या काही तासांत पाकिस्तानकडून या कराराचे उल्लंघन करण्यात आले आहे. भारतीय लष्कर योग्य ते प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानने या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मिस्त्री यांनी केले आहे.
12 मे रोजी दोन्ही देशांत होणार चर्चा
दरम्यान, अमेरिकेच्या मध्यस्तीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. 10 मे रोजीच्या सायंकाळपासून हा करार झाला आहे. तसेच या कराराअंतर्गत 12 मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा होणार आहे.